अमरावती: जिल्ह्यातील नांदगांव पेठेत एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. शेतीच्या सुरक्षेसाठी खोदलेल्या अनधिकृत नालीमध्ये बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेमुळे कुटुंबीय व शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून घटनेस जबाबदार असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा शेतकऱ्याचा मृतदेह उचलणार नाही असा इशारा कुटुंबीयांनी दिल्यानंतर नांदगांव पेठ पोलिसांनी मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून प्रॉपर्टी ब्रोकर दीपक फाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश विजय जवंजाळ (४०)असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

अमरावतीमधील प्रॉपर्टी ब्रोकर दीपक फाळके यांनी कठोरा गांधी येथे शेती विकत घेतली. शेतीच्या बाजूला पुरातन नाली असून पावसाचे पाणी या नालीमधून वाहून जाते. मात्र हे पाणी आपल्या शेतात येईल आणि पीक खराब होईल या भीतीने दीपक फाळके यांनी या पाण्याचा प्रवाह बदलवण्यासाठी चक्क जेसीपीद्वारे नाली खोदून त्यांच्या शेतीकडे जाणारा प्रवाह बंद केला आणि कठोरा या भागातून नाली खोदून ठेवली. शेतकऱ्यांनी विरोध केला असता त्यांना अरेरावीची व बघून घेण्याची धमकी देऊन बळजबरीने आणि अनधिकृतपणे नाली खोदली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे संपूर्ण पाणी एका ठिकाणी साचले असून त्याला तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे.
सुनेला कुत्र्याची ऍलजी, पण सासू-सासरे ऐकेनात; नाराजीतून लेकीसह टोकाचं पाऊल उचललं
ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या बाजूला निलेश जवंजाळ यांचे शेत असून काल संध्याकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे निलेश जवंजाळ हे दुचाकीने आपल्या शेतातील जनावरांना चारा देण्यासाठी गेले असता बराच वेळ होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात आणि आजूबाजूच्या गावामध्ये शोधाशोध सुरू केली. मात्र सकाळ झाली तरी निलेश जवंजाळ यांचा पत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी कुटुंबातील काही सदस्य पुन्हा शेताजवळ शोधाशोध करायला गेले, तेव्हा ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या ठिकाणी पाण्यात बुडबुडे दिसल्याने निलेश यांच्या भावाने पाण्यात उडी घेऊन बघितले तर निलेश यांची दुचाकी व त्याखाली निलेश यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच आक्रोश झाला.

तलावसदृश पाण्याच्या बाजूला निलेश यांनी दुचाकी लावून ते शेतात गेले व परत आल्यानंतर त्या पाण्यात वाहनासह तोल गेल्याने निलेश जवंजाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी शक्यता आहे. वर्षानुवर्षे जुन्या नालीमधून पाणी वाहत होते तेव्हा कोठेही पाणी थांबत नव्हते किंवा कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले नव्हते. मात्र दीपक फाळके यांनी मनमानी करत आणि पैशाचा माज दाखवत पुरातन नालीचा प्रवाह बदलल्याने निलेशचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
शेत विकून रिक्षा घेतली; दीड महिन्यांत २२ हजारांचं चलान; चालकानं टोकाचं पाऊल उचललं
निलेश यांच्या कुटुंबीयांनी नांदगांव पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दीपक फाळके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. पोलिसांनी समयसूचकता दाखवत दीपक फाळके यांच्यावर भादंविच्या कलम ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्रवारी (दि.१६) रोजी शवविच्छेदन झाल्यावर निलेश जवंजाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात कठोरा गांधी येथे अंत्यसंस्कार पार पडले.

आईसह कुटुंबाची जबाबदारी होती निलेशवर
७० वर्षीय आई, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी निलेश यांच्यावर होती. निलेश यांच्या जाण्याने कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय दोन्ही मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here