चिपळूणच्या महापुरानंतर सर्वच यंत्रणांनी एकत्रितपणे गाळ काढण्यापासून ते लोकांना सावधगिरीचे इशारे देण्यापर्यंतच्या केलेल्या उपाययोजनांमुळे यंदा मोठया पावसातही चिपळूण सुरक्षित आहे. पण पावसाच्या बदललेल्या पॅटर्नमुळे अनेक नवीन समस्याही समोर येत आहेत. नद्यांना पूर येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नद्यांची रुंदी वाढवणे शक्य नाही. त्यामुळे यापुढे भविष्यातील बांधकामे करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पावसाचा इशारा देणाऱ्या यंत्रणा, लोकांना सावधगिरीचा इशारा देणारी व्यवस्था या अधिक सक्षम करण्याची सूचनाही मोडक यांनी सरकारला केली आहे.
कोकणातील नद्यांचा स्वतंत्र अभ्यास गरजेचा
मुसळधार पावसात एक तासात कोकणातील अनेक नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. पावसाबरोबरच समुद्रातील भरती, ओहोटीचाही या पुराशी थेट संबंध असतो. नद्या जेथे समुद्राला मिळतात तेथे मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पुराचा धोकाही सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची रुंदीही कमी झाली आहे. त्यामुळे कोकणातील पुराच्या धोक्याचे वास्तव लक्षात घेऊन यावर सर्वच नद्यांच्या बाबतीत नव्याने अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्याचा सल्लाही मोडक यांनी सरकारला दिला आहे.
पर्याय पूर साठवण क्षमता वाढवण्याचा
धरणक्षेत्रात धोक्याची पातळी वाढली की पाण्याचा विसर्ग करणे हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते त्यातूनच अनेक गावे पाण्याखाली येतात. यातून होणारे नुकसानही दरवर्षी हजारो कोटींच्या घरात असते. हे चित्र बदलण्यासाठी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पुराचा धोका याचा अभ्यास करून धरणातील पूरशोषण क्षमता वाढवते शक्य आहे का, याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचारमंथन करण्याची गरजही मोडक यांनी व्यक्त केली. धरणेच नष्ट करण्याचा काहींचा विचार हा न पटणारा असून आर्थिक नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी धरणांची साठवण क्षमता वाढवणे, पावसाचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन धरणातून पाणी सोडण्याच्या पद्धतीत सुधारणा करता येईल का, यावर याविषयातील तज्ज्ञ आणि सरकारी यंत्रणा यांनी एकत्रित विचार करणे गरजेचे असल्याचे मोडक यांचे म्हणणे आहे.