नाशिक : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझन या दोन्ही नद्यांना महापूर येऊन त्यांनी रौद्रारूप धारण केलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच पूरग्रस्तांसाठी गुरुद्वारात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सलग होत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना महापूर आला असला तरी सुदैवाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.