औरंगाबाद : जायकवाडी येथील पंपहाउसच्या एका पंपामध्ये रात्री उंदीर शिरल्याने स्पार्किंग होऊन पंपहाउसमध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम म्हणून जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा तब्बल ११ तास बंद राहिला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक या घटनेमुळे पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलले गेले आहे.

जायकवाडी धरण तुडुंब भरलेले असताना शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. गेल्याच आठवड्यात जलवाहिनी फुटल्याच्या दोन घटना घडल्या आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला. आता पुन्हा पाणीपुरवठ्यात एका उंदराने विघ्न आणले आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १०० आणि ५६ दशलक्ष लिटर योजनेवरील जायकवाडी येथील पंपगृहात सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी बिघाड झाला आणि पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा बंद पडली.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी पोलिसांची मोठी कारवाई; बाळासाहेब ठाकरेंच्या बॅनरमागेच सुरू होता जुगाराचा अड्डा

पंपगृहातील मुख्य पॅनलमध्ये तपासणी केली असता पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीर शिरल्याने स्पार्किंग होवून सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वीजपुरवठा बायपास करून ५६ दशलक्ष लिटरची योजना पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सुरू करण्यात आली. १०० दशलक्ष लिटर योजनेवरील दुरुस्तीचे काम करून ही योजना सुरू करण्यासाठी अकरा तास पाच मिनिटे लागली.

दरम्यान,दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here