मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत भातखळकरांनी शरद पवार यांचीही याप्रकरणातल्या सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत जवळपास दोन महिन्यांपासून अटकेत आहेत. अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना जामीन मिळालेला नाहीये. कालच त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

अतुल भातखळकरांनी पत्रात काय म्हटलंय?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरून हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यापर्यंत जात आहेत. मराठी माणसाला न्याय देण्याकरिता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरिता यासंदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा आशयाचं पत्र भातखळकरांनी फडणवीसांना पत्र लिहून केली आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा आणि संजय राऊत यांचा संबंध काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पत्राचाळ घोटाळा नेमका काय?

पत्राचाळ जमीन घोटाळा एक हजार ३४ कोटी रुपयांचा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ;ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरुंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ तसेच २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले. या प्रकरणात अटकेत असलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे ‘ईडी’तील सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरांवर वसली असून तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत, असा करार २०१०मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हौसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएफ समूहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १,०७४ कोटी रुपये जमवले. त्याचवेळी पत्राचाळीचा एक इंचही पुनर्विकास केला नाही. त्याशिवाय याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले.

हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले. यातील ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ‘ईडी’चा संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here