ही कहाणी आहे वाशिमच्या एका दाम्पत्याची शिवानी आणि विरु (दोघांचीही नावे बदललेली) दोघंही एकाच गावातील रहिवासी. या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं त्यांनी आयुष्य भर एकमेकांची साथ देण्याच्या आणा-भाका घेतल्या. पण यात मोठा अडसर होता तो म्हणजे आडनावाचा दोघांचही आडनाव एकच. समाजाच्या दृष्टीने दोघेही भावकीतली. यामुळे लग्नाला मान्यता मिळणे दुरापास्तच होतं. पण ते दोघे मात्र ठाम की आपल्याला लग्न करायचं. त्यांनी एक दिवस पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
२०१४ मध्ये ते घर सोडून पळाले त्यानंतर दोघांनी लग्न केलं. मुबई – पुणे – औरंगाबाद अशा मोठ्या शहरात मिळेल ते काम करत शेवटी ते शिर्डीमध्ये मागील काही वर्षांपासून स्थायिक झाले. इकडे मुलीच्या वडिलांनी मुलाविरोधात मुलीला पळवून नेल्याचा वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरवातीला काही दिवस पोलिसांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ते दोघेही वारंवार त्यांचं ठिकाण बदलवत असल्याने पोलिसांना त्यांचा पत्ता मिळत नव्हता. शेवटी पोलिसांनी केस थंड बस्त्यात टाकली आणि घरच्यांनी मुलगी परत येण्याची आशा सोडली. त्यानंतर वाशिमचे विद्यमान पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी जिल्ह्यातून हरवलेल्या पळून नेलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केलं आणि या केसचा पुन्हा एकदा तपास सुरू करण्यात आला.
दरम्यान, तब्बल आठ वर्षांचा काळ लोटल्याने सगळं काही सुरळीत सुरु असल्यामुळे मुलाचाही त्याच्या घरच्यांशी संपर्क सुरु झाला होता. याचाच धागा पकडत सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी या दोघांना शिर्डीत ताब्यात घेतलं. मुलगी सांगत होती “मी माझ्या मर्जीने आली आहे”. मुलगा सांगत होता “आमच्या दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे”. पण पोलिसही काही करु शकत नव्हते. कारण २०१४ मध्ये जेव्हा मुलगी पळाली होती तेव्हा ती अल्पवयीन होती.
पोलिसांनी त्या दोघांना वाशीमला आणलं त्यानंतर मुलीच्या आई वडिलांना बोलावून मुलगी त्यांच्या ताब्यात दिली आणि मुलाला अटक केली. यामुळे त्या दोघांच्याही मर्जीने सुरु असलेला आठ वर्षाचा सुखी संसार कायद्यामुळे तुटण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. मात्र, मुलीच्या आई-वडिलांसमोर मुलीचा आठ वर्षाचा सुखी संसार तोडण्याचा बाका प्रश्न उभा राहिला होता. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि मुलीला तिच्या मर्जीने परत मुलाकडे पाठवले.