मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला आक्रमक आव्हान दिलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचं उद्धव यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. ‘मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय यंत्रणा असे सगळे जण आपल्यावर चालून येणार आहेत; मात्र मर्द अशाच लढाईची वाट पाहत असतो आणि ती वेळ आता आली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबई महापालिकाच काय, विधानसभेची निवडणूकही घ्या. तुम्हाला अस्मानाच दाखवतो’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या विरोधकांना दिलं.

उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं असलं तरी ही निवडणूक शिवसेनेसाठी सोपी असणार नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडत शिवसेना नेतृत्वाला हादरे दिले होते. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड हे इतर बंडांपेक्षा वेगळं आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारं ठरलं आहे. कारण शिंदे यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश न करत शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान देत थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. शिवसेना कोणाची हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

महाराष्ट्र सदनात रात्री बैठक सुरु असताना एकनाथ शिंदे अचानक बाहेर पडले अन्….

निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार ‘टर्निंग पॉईंट’?

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधी मराठी आणि नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत शिवसेना ही संघटना जनमाणसात रुजवली. प्रांतिक आणि भाषीय अस्मितेच्या जोरावर शिवसेनेची वाढ झाली. त्यामुळे शिवसेनेशी संबंधित सर्वच प्रतिके या पक्षाच्या समर्थकांसाठी अस्मितेचा विषय ठरली. यामध्ये पक्षाच्या भगव्या झेंड्यापासून पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचा मतदार आपला उमेदवार कोण आहे, हे न बघताही केवळ धनुष्यबाण चिन्ह डोळ्यासमोर ठेवून ईव्हीएमचं बटण दाबतो, असं राजकीय निरीक्षक सांगतात. मात्र आगामी निवडणुकीत हे धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना, याबाबतच अनिश्चितता आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतल्यास तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण शिवसेनेच्या मतदारांच्या मनामनात रुजलेलं हे चिन्ह गमावल्यास उद्धव यांनी पुन्हा नव्याने संपूर्ण डोलारा उभा करावा लागणार आहे.

देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं? शिवसेनेनं तिरकस शब्दांत चढवला हल्ला

गटप्रमुखांच्या मेळाव्यात नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिवसेनेच्या बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. ‘शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार’, असे भाषणाच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ‘शिवसेनेला बदनाम करण्यासाठी, संपविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय यंत्रणा आणि सोबत मुन्नाभाईपण आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंबाला संपवायचे आहे, मग माझ्यासमोर बसलेले सगळे ठाकरे कुटुंबच आहे. या प्रत्येकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तुम्ही याच, तुम्हाला अस्मान काय ते दाखवतो’, असे उद्गार उद्धव यांनी यावेळी काढले.

‘शहानितीवर बोलणार’

‘मी दसरा मेळाव्यात शहानितीवर सविस्तर बोलणार आहे. त्यांच्या नितीप्रमाणे मराठी आणि हिंदूंमध्ये फूट पडणार नाही. हिंमत असेल तर येणाऱ्या महिन्याभरात मुंबई महापालिका तसेच विधानसभेची पण निवडणूक घेऊन दाखवा, असे माझे त्यांच्या चेल्याचपाट्यांना आव्हान आहे’, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here