Dharavi redevelopment | गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे कालची भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अदानी समूहाला (Adani Group) व्यावासायिकदृष्ट्या रस आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळण्याचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले होते.

हायलाइट्स:
- गौतम अदानी वाट वाकडी करून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर का गेले?
- उभयतांमध्ये तब्बल तासभर चर्चा
शिंदे-फडणवीस सरकारने अलीकडेच धारावीच्या पुनर्विकासासाठी निवीदा मागवण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारच्या काळात धारावी पुनर्विकासाबाबत तीन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी या प्रकल्पासाठी अदानी समूहाचे नाव चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धारावीला देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनवणे हे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न शिवसेना प्रत्यक्षात उतरवेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अदानी आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे कालची भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अदानी समूहाला व्यावासायिकदृष्ट्या रस आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळण्याचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले होते. याशिवाय, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. त्यानंतर धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मिळाल्यास अदानी समूहाच्या संपत्तीत खूप मोठी वृद्धी होण्याची शक्यता आहे.
जगातील आघाडीच्या श्रीमंतांमध्ये अदानींचा समावेश
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय उद्योगविश्वात गौतम अदानी यांचा दबदबा उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी यांनी फ्रान्सचे बर्नार्ड अर्नोल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान संपादन केला होता. अदानींची संपत्ती आता १५५.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १२.३७ लाख कोटी इतकी झाली आहे. अदानी समूहाचे कर्ज २.२ लाख कोटी रुपयांवरून २.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले असतानाच अदानींची संपत्ती एवढी कशी झाली? अदानी यांच्या संपत्तीचं नेमकं रहस्य काय आणि त्यांनी जगातील दुसऱ्या क्रमाकांचा श्रीमंती व्यक्ती होण्याचा मान कसा पटकावला, अशी शंकाही अनेकांकडून उपस्थित केली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.