Maharashtra Cabinet portfolios | शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे भाजपचे केंद्रीय नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ग्रामीण भागाशी निगडीत असणारी खाती आपल्या पदरात पाडून घेणार का, हे पाहावे लागेल. सध्याच्या घडीला शिंदे गटाकडे कृषी, रोजगार हमी व फलोत्पादन ही केवळ दोनच ग्रामीण भागाशी निगडीत खाती आहेत.

 

Devendra Fadnavis Eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • शिंदे गटाला ग्रामीण भागाशी निगडीत खाती मिळावीत
  • ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यापैकी एखादे खाते आपल्याला मिळावे
  • शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून आलेले बहुतांश आमदार हे ग्रामीण महाराष्ट्रातील
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्त्वाचा विचार पुढे नेणाऱ्या भाजपसोबत आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती केली आहे, असे सांगणारा शिंदे गट खातेवाटपाबाबत असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील ९ आमदारांनी ऑगस्ट महिन्यात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, बहुतांश मलाईदार खाती ही भाजपच्या वाट्याला गेली होती. यावरुन बरीच चर्चाही रंगली होती. त्यानंतरही शिंदे गट (Eknath Shinde camp) आणि भाजपकडून सर्वकाही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, आता शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची नाराजी उफाळून येताना दिसत आहे. शिंदे गटाच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडीत एकही प्रमुख खाते आलेले नाही, यावरुन शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटाला ग्रामीण भागाशी निगडीत खाती मिळावीत, असा धोशा शिंदे गटाने भाजपकडे लावला आहे. भाजपकडे असलेल्या ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यापैकी काही खाती आपल्याला मिळावीत, असा शिंदे गटाचा आग्रह असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे भाजपचे केंद्रीय नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ग्रामीण भागाशी निगडीत असणारी खाती आपल्या पदरात पाडून घेणार का, हे पाहावे लागेल. सध्याच्या घडीला शिंदे गटाकडे कृषी, रोजगार हमी व फलोत्पादन ही केवळ दोनच ग्रामीण भागाशी निगडीत खाती आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून आलेले बहुतांश आमदार हे ग्रामीण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे अडीच वर्षांच्या काळात काहीतरी भरीव कामगिरी करुन दाखवायची असेल, तर शिंदे गटाच्या आमदारांकडे ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकणारी खाती असणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्रामीण भागात शिंदे गटाची पाळेमुळे आणखी घट्ट रुजवता येतील. पण पहिल्या मंत्रिमंडळात विस्तारात भाजपने ग्रामीण भागाशी निगडीत ग्रामविकास, जलसंपदा, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय ही महत्त्वाची खाती पटकावली आहेत. या खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यापक निर्णय घेतले जाऊ शकतात. याउलट शिंदे गटाकडे असणाऱ्या कृषी, रोजगार हमी व फलोत्पादन खात्यांमध्ये काम करण्यासाठी तितकासा ‘स्कोप’ नाही. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाल्याचे सांगितले जाते.
देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्र्यांना भर मंत्रिमंडळ बैठकीत झापलं, सत्तारांची हाताची घडी तोंडावर बोट!
शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा नवरात्रीनंतर पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिंदे गटातील संजय शिरसाट यांच्यासारखे आमदार अगोदरच नाराज आहेत. तसेच अपक्ष आमदारांनाही पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी मिळाली नव्हती. अशातच आता शिंदे गटाकडून मनासारखी खाती देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
महाराष्ट्र सदनात रात्री बैठक सुरु असताना एकनाथ शिंदे अचानक बाहेर पडले अन्….
`कुठून अवदसा आठवली, भाजपच्या नादाला लागलो`

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाचे काही आमदार खासगीत सांगतात की, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच जयंत पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याचेही म्हटले. भाजपला आमदारांची संख्या १०५ वरून ८० वर येईल, अशी भीती वाटत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here