Dussehra Melava 2022 | मुंबई महानगरपालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी शिवसेनेविरुद्ध जोरकसपणे युक्तिवाद केला. मात्र, शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी परवानगीचा अर्ज दाखल करूनही पालिकेने त्यावर निर्णय देण्यास इतका विलंब का लावला, असा प्रश्न खंडपीठाने पालिकेच्या वकिलांना विचारला. त्यावर वकिलांनी हा पालिकेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले. न्यायालयाने नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत पालिकेचा निर्णय उचित नसल्याचे म्हटले.

हायलाइट्स:
- शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता
- शिवसेनेला दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी
मुंबई महानगरपालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी शिवसेनेविरुद्ध जोरकसपणे युक्तिवाद केला. मात्र, शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी परवानगीचा अर्ज दाखल करूनही पालिकेने त्यावर निर्णय देण्यास इतका विलंब का लावला, असा प्रश्न खंडपीठाने पालिकेच्या वकिलांना विचारला. त्यावर वकिलांनी हा पालिकेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले. न्यायालयाने नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत पालिकेचा निर्णय उचित नसल्याचे म्हटले. शिवसेनेने पालिकेकडे यंदाच्या आयोजनासाठी २२ ऑगस्ट रोजी अर्ज दिला होता. २२ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर या कालावधीत अर्जावर निर्णय का दिला नाही, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर पालिकेला देता आले नाही. पालिकेने अर्जावर वेळेत उत्तर न दिल्यामुळे त्यावर सुनावणी घेण्याचे ठरवले, असे न्यायालयाने म्हटले. पालिकेची शिवसेनेच्या अर्जावर निर्णय घेण्यातील हीच दिरंगाई काहीअंशी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती सिद्ध झाले.
यावेळी पालिकेकडून कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करण्यात आले. दादर परिसरात काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटात वाद झाला होता. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पालिकेचे म्हणणे होते. मात्र, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करा, असे सांगत उच्च न्यायालयाने हा मुद्दाही निकाली काढला. त्याचवेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेली हस्तक्षेप याचिकाही फेटाळून लावली.
BMCच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
मुळात शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा हा शिवसेनेचा मूलभूत हक्क नाही. दरवर्षी ज्यांचे अर्ज आले त्यांचा विचार करून पालिकेने परवानगी दिली. त्यात २०२० आणि २०२१ या वर्षांत करोना संकटामुळे परावानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेतर्फे अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी आमच्याकडे अर्ज दिला आणि त्यानंतर ३० ऑगस्टला सदा सरवणकर यांनीही शिवसेनेतर्फेच अर्ज दिला. या पार्श्वभूमीवर पालिकेने पोलिसांकडून अभिप्राय मागवला. १४ सप्टेंबर रोजी दादर पोलिस ठाण्याची मुंबई महापालिकेकडे विनंती आली होती की, गणेशोत्सव काळात दोन्ही गटांकडून होर्डिंग, बॅनर लागले होते. यामुळे दोन्ही गटांत वाद हाऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी आपल्या अभिप्रायात नोंदवल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.