मुंबई : साडे चार तासांच्या सुनावणीनंतर बॉम्बे हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना उत्साहात वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं आवतानच धाडलं. तसेच न्यायालयाच्या निर्देशानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकार व्यवस्थित पार पाडेल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेने शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज शिंदे गट-मुंबई महापालिका आणि ठाकरेंच्या वकिलांनी सुमारे साडे चार तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने शिंदे गट-मुंबई महापालिकेला दणका देत उद्धव ठाकरेंना दिलासा दिला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा अंतरिम अर्ज फेटाळत सरवणकर यांना या खटल्यात सहभागी होण्याचा ‘लोकस’ नाही हा ठाकरे गटाचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला. यावेळी हायकोर्टाने पालिकेला देखील खडे बोल सुनावले. पालिका आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा ठपका ठेवत कोर्टाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दर्शवला.

कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनात एकच गर्दी केली होती. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना भवनासमोर मोठा जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे तसेच मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली. शिवसैनिकांच्या जल्लोषानंतर उद्धव ठाकरे यांनीही ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

शिवाजी पार्कवर आव्वाज शिवसेनेचाच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी!
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोर्टाने आज शिवतीर्थावर आम्हाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थकी लागला. शिवसैनिकांनी आता उत्साहात यावं, वाजत गाजत या, गुलाल उधळत यावं. पण येताने तेजस्वी वारशाला गालबोट लागू देऊ नका. कारण आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचं आणि जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांचं लक्ष लागलंय. ५६ वर्षांची आपली ओजस्वी परंपरा आहे”.

“कोर्टाने आजचा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. सरकार ती जबाबदारी पार पाडेल, अशी आपण आशा करुयात. पहिला मेळावा आजोबा प्रबोधनकार आणि वडील बाळासाहेबांनी घेतला, ओजस्वी परंपरा आम्ही पुढे नेतोय. गोरेगावच्या नेस्को मैदानावर गट प्रमुखांचा मेळावा घेतला. आपण सभेचं चित्र पाहिलं. आता दसरा मेळाव्याचंही बघा…”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, लोकशाहीचा विजय झाला, सुप्रीम कोर्टातील निकाल हा फक्त शिवसेनाच नाही तर लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा आहे, अशी टिप्पणीही उद्धव ठाकरेंनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here