मुंबई : ‘मीडियाला एवढी घाई काय आहे? अजून पितृपंधरवडा सुरु आहे. नंतर घटस्थापना आहे आणि त्यानंतर दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्याबाबत घाई काय, तुम्हाला त्याबद्दल लवकरच कळेल’, अशी प्रतिक्रिया देऊन गेली १ महिना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा सस्पेन्स वाढवला. शिवसेनेचा (ठाकरे) दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे गटाने शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण आज मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि मुंबई पालिकेला फटकारत उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे. आजच्या या साऱ्या घडामोडींवर विस्ताराने बोलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला आहे. फक्त एका ओळीची प्रतिक्रिया देऊन त्यांनी ठाण्यातून मुंबईकडे कूच केलं.

मुंबई महापालिकेने शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज शिंदे गट-मुंबई महापालिका आणि ठाकरेंच्या वकिलांनी सुमारे साडे चार तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने शिंदे गट-मुंबई महापालिकेला दणका देत उद्धव ठाकरेंना दिलासा दिला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा अंतरिम अर्ज फेटाळत सरवणकर यांना या खटल्यात सहभागी होण्याचा ‘लोकस’ नाही हा ठाकरे गटाचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला. यावेळी हायकोर्टाने पालिकेला देखील खडे बोल सुनावले. पालिका आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा ठपका ठेवत कोर्टाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दर्शवला.

शिवाजी पार्कवर आव्वाज शिवसेनेचाच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी!
कोर्टाच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची चुप्पी!

दसरा मेळावा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. ठाण्यातून मुंबईकडे मुख्यमंत्री निघत असताना प्रसारमाध्यमांनी त्यांनी आजच्या प्रकरणावर बोलण्याची विनंती केली. परंतु या प्रकरणी प्रवक्ते बोलतील असे सांगत विस्ताराने बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. एका ओळीची प्रतिक्रिया देऊन मुख्यमंत्री ठाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

ठाकरेंनी मैदान मारलं! कोर्टाच्या निर्णयानंतर बाळासाहेबांचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले…
कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोर्टाने आज शिवतीर्थावर आम्हाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थकी लागला. शिवसैनिकांनी आता उत्साहात यावं, वाजत गाजत या, गुलाल उधळत यावं. पण येताने तेजस्वी वारशाला गालबोट लागू देऊ नका. कारण आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचं आणि जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांचं लक्ष लागलंय. ५६ वर्षांची आपली ओजस्वी परंपरा आहे”.

“कोर्टाने आजचा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. सरकार ती जबाबदारी पार पाडेल, अशी आपण आशा करुयात. पहिला मेळावा आजोबा प्रबोधनकार आणि वडील बाळासाहेबांनी घेतला, ओजस्वी परंपरा आम्ही पुढे नेतोय. गोरेगावच्या नेस्को मैदानावर गट प्रमुखांचा मेळावा घेतला. आपण सभेचं चित्र पाहिलं. आता दसरा मेळाव्याचंही बघा…”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here