पुणे: राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आपापल्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. विजयादशमीच्या संध्याकाळी एकीकडे शिवाजी पार्क आणि दुसरीकडे बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही जवळपास एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की कोणाचे भाषण ऐकायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तुम्ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन, असे अजित पवार यांनी सांगितले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करेल. दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान यासंदर्भातही अजित पवार यांनी मत मांडले. मोठमोठे राजकीय मेळावे केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावलं जातं. तेव्हा अशा घटना घडत असतात. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन इर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar: अजितदादा म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांना विचारतो, मी ट्रेनिंगला कधी येऊ, किती फी घेणार?’

राज ठाकरेंनी दौरा काढला तर तुम्हाला काय त्रास होतो? अजित पवारांचा सवाल

यावेळी अजित पवार यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भ दौरा केला होता. यानंतर ते कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावर अजित पवार यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी दौरे काढले तर तुम्हाला काय त्रास होतो? प्रत्येक पक्षाच्या नेत्याला राज्यात दौरे काढण्याचा अधिकार आहे. मतदारांना ज्याची भूमिका पटेल, त्याच्या पाठिशी लोक उभे राहतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
दसऱ्याला मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती; शिंदे गटाकडून तीन हजार खासगी बस आरक्षित, तर…

भुजबळ आणि अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर अजितदादांची सावध भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती देवीच्या प्रतिमेऐवजी महापुरूषांची छायाचित्रं लावावीत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्त्वव्यावरुन वादंग झाला होता. याविषयी अजित पवार यांना विचारणा झाली असता त्यांनी म्हटले की, ते छगन भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसे मत नाही. पण प्रत्येकाला त्याच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

तर २०१४ मध्ये एकनाथ शिंदे हे अशोक चव्हाणांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले होते, या चर्चेविषयी बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. हे सगळे २०१४ मध्ये घडले आहे, आता आपण २०२२ मध्ये आहोत, थोड्याच दिवसांत २०२३ सुरु होईल. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात अर्थ नाही. जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं केली जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here