मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला जात आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून आज एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेण्यात आला. “शिंदे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात एक चटकदार वाक्य आहे ते असे की, ‘राजकारणात सगळेच सारखे नसतात. काही आनंद दिघे असतात.’ त्याच धर्तीवर आता सांगता येईल. सगळ्यांनाच दिघे बनता येत नाही. काही शिंदेही बनतात. शिंदे यांचा दसरा मेळावा म्हणजे चोरांचे संमेलन ठरेल. त्यात दिघ्यांचे नाव घेणे हा त्या पुण्यवान माणसाचा अपमान ठरेल,’ असा घणाघात ‘सामना’तून करण्यात आला आहे. सामनातील या टीकेला शिंदे गटातून आमदार शहाजी पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘सगळेच आनंद दिघे नसतात, हे बरोबरच आहे. पण त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं कार्य पुढे तेवढ्याच जोमाने आणि निष्ठेने चालवणारा पण एखादाच एकनाथ शिंदे असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं,’ असं म्हणत शहाजी पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसंच बीकेसी मैदानात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जो मेळावा होत आहे तो शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा आणि ज्यांनी दिवस-रात्र जीवाची परवा न करता शिवसेना वाढवली त्या आनंद दिघे यांच्या अस्मितेचा मेळावा होत आहे. दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली अशा लोकांचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील राजदच्या आणखी एका मंत्र्याची विकेट, कृषीमंत्र्यांचा राजीनामा
राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि तळागाळातला शिवसैनिक शिंदे साहेबांकडे यायला लागला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी आहे, असंही शहाजी पाटील यांनी म्हटलं आहे.
‘सामना’तून हल्लाबोल; रोखठोक सदरात नक्की काय म्हटलं आहे?
रोखठोक या सदरातून आज ‘सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदे असतात’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात. शिंदे हे आनंद दिघ्यांचे शिष्य शोभतील काय? आज ते शिवसेनेचा समांतर दसरा मेळावा घ्यायला निघालेत. चार हजार एसटी गाड्या गर्दी जमवण्यासाठी भाडय़ाने घेणार आहेत. पुन्हा इतर खर्च वेगळाच. कुठून येते ही आर्थिक ताकद? आनंद दिघे यांना हे उपद्व्याप कधीच करावे लागले नाहीत. त्यांना मोह नव्हता. त्यांची शिवसेना निष्ठा हे ढोंग नव्हते. ते खरेच मनाने व कर्तृत्वाने महान होते. दिघे धार्मिक होते…अघोरी नव्हते. दिघे वायफळ बोलत नव्हते. माणसे विकत घेऊन राजकारण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. दिघे कुणी तत्त्वज्ञ नव्हते. गरीब, अन्यायग्रस्तांना मदत करणारा ते मसिहा होते. आनंद दिघे यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती, पण त्यांच्या त्यागाची व निष्ठेची कवने संपूर्ण राज्यात गायली जात होती. दिघे माणसांना ‘पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत,’ अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.