Maharashtra Politics | भाजपने बीकेसीवरील इव्हेन्टची कथा-पटकथा लिहिली होती. नारायण राणे यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले. भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा ‘ओकारया’ काढाव्याच लागतात, नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे ‘ईडी’कडून बडवले जाईल, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आता शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हायलाइट्स:
- बीकेसीच्या मेळाव्यात मोदी मोदी आणि शहा शहा गर्जना
- दसरा मेळाव्याच्या नावाखाली बीकेसीच्या मैदानावर ‘फॅशन शो’
शिंदे गट स्वत:ला बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणवून घेतो. पण भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. भाजपने देशात एक ‘इव्हेन्ट’ युग आपल्या देशात आणले आहे. त्यात जन्मापासून मयतापर्यंत उत्सव किंवा इव्हेन्टच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत ‘इव्हेन्ट दसरयाच्या निमित्ताने बीकेसी मैदानावर झाला, तेच, तेच आणि तेच रहाणे याशिवाय तिथे दुसरे काय होते? नारायण राणे यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले. भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा ‘ओकारया’ काढाव्याच लागतात, नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे ‘ईडी’कडून बडवले जाईल, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यासाठी दोनेक हजार एसटी गाड्या गर्दी मुंबईत आणण्यासाठी बुक झाल्या व त्याकामी १० कोटी रुपये रोख भरण्यात आले. हे रोख १० कोटी रुपये एसटी कर्मचारी तीनेक दिवस मोजत होते. शिवाय मैदानावर दोन लाख लोकांना पंगत दिली गेली. आता हे रोखीतले १० कोटी मिंधे गटाच्या कोणत्या बँक खात्यातून आले? इतक्या कमी वेळात कोणी कोठे हात मारला, असा सवालही ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका
दसरा मेळाव्याच्या नावाखाली बीकेसीच्या मैदानावर एखादा ‘फॅशन शो’, ‘सौंदर्य स्पर्धा व्हावी तसा एक सोहळा झाला व त्यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा महाराष्ट्राच्या कल्याणकारी ‘मा.मु.’ साहेबांनी केला तो फक्त एकाच कारणासाठी, ते म्हणजे ‘मी म्हणजेच शिवसेना ही खटपट सिद्ध करण्यासाठी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे २७ पानांचे प्रदीर्घ भाषण वाचून दाखवले. इतर वक्त्यांनी जी भाषणे केली ती म्हणजे निर्लज्जपणाचे टोक होते. मिंधे गटाच्या शीतलताईंनी जोरात भाषण केले. शिवसेनेवर टीका केली, पण मिंधे गटवाले सुरत-गुवाहाटी येथे मजा मारत असताना याच शीतलताईंनी हातात दांडके घेऊन केलेली भाषणे त्याच व्यासपीठावरून लोकांना ऐकवायला हवी होती. गद्दारांना मुंबईत येऊ द्या, दांडक्याने झोडपून काढू वगैरे भाषणे त्या करीत होत्या. अर्जुन खोतकर हे तर ‘ईडी’च्या भयानेच रडत पळत मिथे झाले. त्याआधी ते मिंधे गटास ‘उंदीर वगैरे म्हणत होते. त्या व्यासपीठावरील प्रत्येकाची एक वेगळीच तरहा व गद्दारीचे स्वतचे वैयक्तिक कारण आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.