इस्लामपूर-ताकारी मार्गावरील राजाराम नगर रस्त्याचं काम सध्या सुरु आहे. अनेक वर्ष हा वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याच्या मोठी दुरावस्था झाली आहे. तर ताकारीकडे जाणारी वाहतूक मोठी आहे. याच रस्त्यावरून ऊसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते त्यामुळे रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याच्या साईटपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरण करताना यांत्रिकीकरणाच्या साह्याने डांबरीकरण सुरु होते.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि धुव्वाधार पाऊस पडत असताना रस्ता रुंदीकरणाचे काम थांबवणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराकडून कामगारांना काम सुरुच ठेवा अशा सूचना आल्याने काम सुरू होते. डांबर मिश्रित खडी डंपरने आणून मशिनच्या साह्याने कामगारांनी डांबरीकरण केले आणि साईडपट्टी भरण्याचा कार्यभार मुसळधार पाऊसात उरकण्यात आला. भर पावसात करण्यात आलेल्या या कामामुळे अनेकांना आश्चर्य तर वाटलचं, शिवाय पावसात करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप ही व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, मुसळधार पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे या निकृष्ठ कामाचा पंचनामा करुन काम पुन्हा करायला भाग पाडू. संबधीत ठेकेदारावर बांधकाम विभागाने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी दिला आहे.