– ५२ आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासी बसवणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आगामी गणेशोत्सवासाठी रेल्वे किंवा एसटी महामंडळाकडून सोडण्यात येणाऱ्या जादा सेवेतील गाड्या सुटणार की नाही याबाबत स्पष्टता नसताना, खासगी ट्रॅव्हल्सनी मात्र चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सची सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरक्षित वावर राखणे बंधनकारक असल्याने ५२ आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स कोकणच्या दिशेने रवाना होत आहेत. ई-पासच्या दृष्टीने किमान दोन दिवस अगोदर बुकिंग करण्याचे आवाहन ट्रॅव्हल्स मालकांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतून कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांची रेल्वे, एसटी या पारंपरिक सेवांसोबत खासगी ट्रॅव्हल्सना मोठ्या प्रमाणात पसंती असते. लॉकडाउनदरम्यान जिल्ह्यांतर्गत बंद करण्यात आल्याने ट्रॅव्हल्स सेवा जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ ठप्प पडली होती. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यावर खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी भर दिला. मात्र, नियमांबाबत संभ्रम कायम असल्याने त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मागील काही दिवसांपासून कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्व खासगी ट्रॅव्हल्सनी पुन्हा एकदा आपली सेवा सुरू केली आहे. ही माहिती आपल्या नियमित प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा चाकरमान्यांना दिलासा देणारी ठरते आहे. सद्यस्थितीत तळकोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनी प्रतिप्रवासी दीड हजार रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनमध्ये सर्व गाड्या जागेवर उभ्या असल्याने सहन करावे लागलेले नुकसान, देखभाल दुरुस्तीचा खर्च तसेच निर्जंतुकीकरणाचा वाढलेला खर्च यामुळे आर्थिक अडचण कायम आहे. त्यात प्रवाशांचा ओघ कमी आहे. परिणामी त्याच खर्चात कमी प्रवासी न्यावे लागत असल्याने तोटा कायम आहे. त्यामुळे प्रवास दर वाढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिकिटाचे दर वाढले असले, तरी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कुठलीही हयगय केली जात नसल्याचे अनेक ट्रॅव्हल्स मालकांनी ‘मटा’लासांगितले.
ई-पासच्या दृष्टीने आवाहन
सध्या २५ प्रवाशांची नोंदणी झाली की ई-पाससाठी प्रक्रिया सुरू केली जाते. आणि परवानगी मिळताच बसेस कोकणाच्या दिशेने रवाना केल्या जातात. त्यामुळे बुकिंग कन्फर्म करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रॅव्हल्समालक करत आहेत. याबाबत, ‘सध्या कोकणात जायचे की नाही याविषयी लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. प्रत्येक दिवशी नवे नियम येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. जिल्हा सीमाबंदी लागू होत नाही, तोपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.’ अशी प्रतिक्रिया ‘रामेश्वर ट्रॅव्हल्स’च्या निलेश राणे यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times