या भीषण अपघातानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत राज्य सरकारला तातडीचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!… त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं आर्थिक मदत करावी. अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. ही बस दुसऱ्या वाहनाला धडकल्याने बसमध्ये अचानक आग लागली. अपघातावेळी बसमध्ये सारे प्रवासी साखरझोपेत होते. त्याचदरम्यान अचानक बस आणि आयशर ट्रेलरची समोरासमोर धडक बसली. यानंतर बसने अचानक पेट घेतला. बसनं पेट घेतल्यानंतर काही सतर्क नागरिकांनी खिडक्यांमधून खाली उडी घेत जीव वाचवला. पण काही प्रवाशांना अचानक घडलेल्या घटनेमुळं बसमधून बाहरे पडता आलं नाही. त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आत्तापर्यंत या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत तर जखमींचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनतर, मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला PMNRF कडून २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. या अपघातानंतर राजकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.