दरम्यान, मोहन भागवत यांचं वक्तव्य ब्राह्मण समाजाला वेगळं पाडण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा आरोप करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?
विदर्भ संशोधन मंडळातर्फे शुक्रवारी ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हिल लाइन्समधील विदर्भ संशोधन मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘सामाजिक समता हा आपल्या परंपरेचा भाग होता. सर्व धर्मांच्या आचार्यांनी त्यांच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्च-नीच्चतेला, अस्पृश्यतेला विरोध असल्याचे जाहीर केलं आहे. जातिभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही. आपल्याकडे गुप्त सम्राटांच्या राजवटीपर्यंत आंतरजातीय विवाह चालायचे. कुणालाचा जातीभेद नको असल्याने ती भावना संविधानातही आली. परंतु, मधल्या काळात आपण केलेल्या चुकांचा, भेदांचा फायदा घेत इंग्रजांनी आपले शास्त्र, पूर्वज चुकीचे आहेत असे सांगितले. त्याला प्रतिकार म्हणून आपणही अस्पृश्यता, वर्णभेद योग्य असल्याचे बोललो. त्यासाठी शास्त्राचे दाखलेसुद्धा देण्यात आले. तरीदेखील अशा प्रकारचे जातीभेदाचे समर्थन मान्य करता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे, पापाचे क्षालन करायलाच हवे,’ असे भागवत यांनी म्हटलं आहे.