अकोला : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा आणि आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना हे नाव कोणत्याही गटाला वापरू न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. पक्षाचं चिन्ह गोठवलं गेल्यानंतर अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

‘बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत, आम्ही शिवसेनेला वाचवत आहोत, असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रतिज्ञापत्र दाखल करतात की शिवसेनेचे चिन्ह गोठवा. त्यामुळे मग हे कोणते बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात, कोणती शिवसेना पुढे नेतात, याचं आत्मचिंतन त्यांनी स्वतः करायला पाहिजे. मुळात शिंदे गटाला शिवसेना संपवायची होती,’ असा आरोप करत नितीन देशमुख यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

Shivsena: काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्यासोबत एकाच कारमधून प्रवास

‘शिंदे गटातील आमदारांची फसवणूक’

‘शिवसेना आपली असून भविष्यात धनुष्यबाण आपल्याला मिळेल, असं सांगून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची फसवणूक केली आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या निकालानंतर या आमदारांना सावरता-सावरता त्यांचा पूर्ण वेळ निघून जाईल. आमदारांना आता सांगायचं काय, या विचारने त्यांना घाम फुटला असेल. त्यामुळे आज शिंदे गटाने तातडीची बैठक बोलावली असेल,’ असा हल्लाबोलही नितीन देशमुख यांनी केला आहे.

ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांचा सेम नावावर क्लेम; कुरघोडीच्या राजकारणात कोणाचा गेम?

‘भाजपचा कट, मात्र शिवसेना पुन्हा उभी राहणार’

‘शिवसेना संपवण्यासाठी भाजपने हा संपूर्ण कट केला आहे. रामाचा धनुष्यबाण गोठवण्याचं पाप भारतीय जनता पार्टी आणि या शिंदे गटाने केलं. त्यामुळे रामाच्या नावावर या देशामध्ये आणि महाराष्ट्रात मतं मागण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला,’ असं आमदार देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच ‘शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेल्याची बातमी येताच संपूर्ण देशात एक सहानुभूतीची लाट उद्धवसाहेबांबद्दल पुन्हा पसरली. त्याच पद्धतीने जेव्हा उद्धव साहेब नवीन चिन्ह घेतील, तेव्हा शिवसेनेचे ते चिन्ह एका मिनिटात सर्वत्र पोहोचल्याशिवाय राहणार नाही. उद्धवसाहेबांनी कोणतंही चिन्ह घेतलं तरी त्या चिन्हाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, याच्याबद्दल कोणतीही शंका नाही,’ असंही नितीन देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here