lok sabha election 2024: १९९६ पासून बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. शरद पवारांनी चार वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाट असूनही सुळे निवडून आल्या. पवारांनी बालेकिल्ला कायम राखला. मात्र आता भाजपनं पवारांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली.

गेल्याच महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचा दौरा केला. २०२४ च्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वाचा होता. बारामतीचा किल्ला भेदण्यासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तशी चर्चा पुणे आणि बारामतीमधील राजकीय वर्तुळात आहे. २०१९ मध्ये इराणी यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अमेठीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पराभव केला. या विजयामुळे इराणी जायंट किलर ठरल्या.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. विविध पक्षांमधील घराणेशाहीवर त्यांनी टीका केली. स्मृती इराणी यांनी अमेठीत हाच मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी गांधी घराण्यावर सडकून टीका केली होती. २०१४ मध्ये त्यांना राहुल गांधींकडून पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतरही त्या मतदारसंघात काम करत राहिल्या आणि २०१९ मध्ये विजय खेचून आणला.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या इराणी यांना बारामतीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे कधीकाळी इराणी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. गुजरात दंगलीनंतर त्यांनी मोदींविरोधात आंदोलन केलं होतं. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. त्यावेळी पक्षात प्रमोद महाजन यांचं महत्त्व अधिक होतं. त्यांच्या अकाली निधनानंतर दिवस बदलले. इराणी यांनी नव्या नेतृत्त्वाशी जुळवून गेलं. पक्षात मोदी-शहांचा वरचष्मा वाढल्यानंतर त्यांना अमेठीची जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.