Maharashtra Politics | अंधेरी पोटनिवडणुकीचा मुद्दा प्राईम टाईममध्ये गाजत होता. या काळात टेलिव्हिजनवर ऋतुजा लटके यांचा चेहरा सातत्याने दिसत होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कोणालाही फारशा माहिती नसलेल्या ऋतुजा लटके यांचा चेहरा अंधेरी पूर्व मतदारसंघ आणि मुंबईतच काय तर संपूर्ण राज्यभरात पोहोचला. शिवसेनेचे (उबाठा) मशाल हे चिन्ह अवघ्या चार-पाच दिवसांमध्ये घराघरात पोहोचले.

 

Rutuja Latke Vs Murji Patel.
ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल

हायलाइट्स:

  • शिवसेनेच्या वर्तुळातही ऋतुजा लटके यांचा चेहरा कोणालाही फारसा परिचित नव्हता
  • अंधेरी पोटनिवडणुकीचे पारडे ठाकरे गटाच्या बाजूला झुकले आहे
  • डाव भाजप आणि शिंदे गटाच्या अंगलट
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. यासाठी मुख्य कारण ठरल्या आहेत, त्या म्हणजे शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार ऋतुजा लटके. ऋतुजा या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके हे दोन टर्म नगरसेवक असतानाही ऋतुजा यांनी मुंबई महानगरपालिकेतील आपली नोकरी सोडली नव्हती. राजकीय वर्तुळातच काय शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातही ऋतुजा लटके यांचा चेहरा कोणालाही फारसा परिचित नव्हता. अशावेळी अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने सहानुभूतीचा फॅक्टर असला तरी मुरजी पटेल यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याशी लढत देणे त्यांच्यासाठी अवघड मानले जात होते. त्यामुळे कोणताही राजकीय आणि कायदेशीर ड्रामा न होता ऋजुता लटके आणि मुरजी पटेल यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले असते तर ठाकरे गटासाठी ही लढाई अवघड ठरली होती. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या अतिआक्रमकपणामुळे सध्या हेच चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेकडून शेवटपर्यंत मंजूर करण्यात आला नाही. मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या सर्व कारभार प्रशासकामार्फत म्हणजे राज्य सरकारच्या आदेशाने चालतो. त्यामुळेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर दबाव आणून भाजप आणि शिंदे-गटाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा शेवटच्या क्षणापर्यंत मंजूर होऊन दिला नाही, असा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि मुंबई महापालिकेसोबत भाजप व शिंदे गटाने स्वत:ची शोभा करुन घेतली. एरवी कोणताही गाजावाज न होता शिवसेना (उबाठा) आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज भरले गेले असते तर ऋतुजा लटके कोण आहेत, हे मतदारांना सांगण्यासाठी, लटके यांचा चेहरा आणि शिवसेनेचे मशाल हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेला अधिक मेहनत घ्यावी लागली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांमध्ये लटके यांच्या राजीनाम्यावरुन आधी पालिकेत आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात जो काही ‘तमाशा’ झाला त्यामुळे सध्यातरी अंधेरी पोटनिवडणुकीचे पारडे ठाकरे गटाच्या बाजूला झुकले आहे.
पतीला अभिवादन करताना डोळ्यात आठवणी दाटल्या, लेकासमोर ऋतुजा लटकेंनी हळूच अश्रू लपवले
अगदी काही दिवसांपूर्वी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यांचे नाव चर्चेत असले तरी ऋतुजा लटके म्हणजे नेमक्या कोण, त्या कशा दिसतात, हे फार लोकांना ठाऊक नव्हते. परंतु, भाजप-शिंदे गटाने ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची मंजूरी रोखून धरण्याची खेळी केली. या माध्यमातून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव आणण्याचा आणि ठाकरे गटाला जेरीस आणता येईल, असा भाजप आणि शिंदे गटाचा होरा होता. परंतु हाच डाव भाजप आणि शिंदे गटाच्या अंगलट आला. ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने रोखून धरल्याची माहिती समोर आली तेव्हा पहिल्या दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर ऋतुजा लटके यांचा चेहरा झळकू लागला. प्रत्येक बातमीगणिक ऋतुजा लटके यांच्याविषयी सामान्य लोकांच्या सहानुभूती वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही पालिकेने आपली आडमुढी भूमिका कायम ठेवत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करणारच नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्याठिकाणी पालिकेच्या वकिलांनी अगदी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके यांच्यावर लायझनिंगचे (मध्यस्थी) आरोप केले. परंतु, उच्च न्यायालयाने या आरोपांना अक्षरश: केराची टोपली दाखवली आणि पालिकेच्या आडमुठ्या भूमिकेवर ताशेरे ओढले. एवढेच नव्हे तर ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करा, असे स्पष्ट आदेश दिले.

Andheri Bypoll: रमेश लटकेंना ठाकरेंकडून मानसिक त्रास, विमानात सगळं सांगितलं, नितेश राणेंचा दावा

मुरजी पटेलांनी प्रचाराला लवकर सुरुवात करूनही ऋतुजा लटके फायद्यात

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऋतुजा लटके आणि ठाकरे यांचा कायदेशीर विजय झालाच. पण या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गट आणि ऋतुजा लटके यांना प्रचंड मीडिया कव्हरेज मिळाले. गेल्या चार दिवसांत अंधेरी पोटनिवडणुकीचा मुद्दा प्राईम टाईममध्ये गाजत होता. या काळात टेलिव्हिजनवर ऋतुजा लटके यांचा चेहरा सातत्याने दिसत होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कोणालाही फारशा माहिती नसलेल्या ऋतुजा लटके यांचा चेहरा अंधेरी पूर्व मतदारसंघ आणि मुंबईतच काय तर संपूर्ण राज्यभरात पोहोचला. तसेच हा मुद्दा सातत्याने धगधगता राहिल्याने शिवसेनेचे (उबाठा) मशाल हे चिन्ह अवघ्या चार-पाच दिवसांमध्ये घराघरात पोहोचले.

हे सगळे नाट्य न घडता पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असती तर अंधेरी पूर्वमधील मतदारांना ऋतुजा लटके यांच्या तुलनेत मुरजी पटेल हा चेहरा अधिक परिचित वाटला असता. मुरजी पटेल आणि त्यांची पत्नी दोघेही या मतदारसंघातील नगरसेवक आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये नाही म्हटलं तरी या दोघांचा अंधेरीतील मतदारांशी चांगल्यापैकी जनसंपर्क होता. तसेच मुरजी पटेल यांनी फार अगोदरपासूनच पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याने त्यांच्याकडे ‘अप्पर हँड’ होता. अशावेळी कालपर्यंत राजकीय क्षेत्रात पाऊलही न ठेवलेल्या ऋतुजा लटके यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली असती. मात्र, गेल्या आठवडाभरात ऋतुजा लटके यांना मिळालेल्या कव्हरेजमुळे आता प्रसिद्धीच्याबाबतीत त्यांनी मुरजी पटेल यांच्याशी बरोबरी किंबहुना काकणभर आघाडी घेतली आहे. मतदारांच्या मनात ऋतुजा लटके यांची एक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे राजकारणात नवख्या असूनही ऋतुजा लटके या मुरजी पटेल यांच्यासाठी तुल्यबळच ठरणार आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here