नवी दिल्ली: ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं. या कालावधीत भारतातील अनेक मौल्यवान वस्तू ब्रिटिशांनी मायदेशी नेल्या. यामध्ये अतिशय मौल्यवान असलेल्या कोहिनूर हिऱ्याचादेखील समावेश आहे. ब्रिटिश महाराणीच्या मुकूटात कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा भारतात परत यावा, असं कोट्यवधी भारतीयांना वाटतं. गेल्याच महिन्यात ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा कोहिनूर हिऱ्याची घरवापसीची चर्चा सुरू झाली.

कोहिनूर हिऱ्याची घरवापसी आणि यासंबंधित प्रश्नांना भारत सरकारकडून उत्तरं देण्यात आली आहेत. कोहिनूर हिरा यूकेहून परत आणण्यासाठीच्या पद्धती शोधणं आम्ही सुरूच ठेऊ, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कोहिनूरच्या घरवापसीबद्दल मोदी सरकारनं याआधी संसदेत माहिती दिली होती. आम्ही वेळोवेळी हा मुद्दा ब्रिटिश सरकारकडे उपस्थित करत आहोत. या प्रकरणी समाधानकारक पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सरकारनं संसदेत सांगितलं होतं.
आठ चित्ते भारताला महागात पडणार? चित्त्यांच्या बदल्यात नामिबियानं मौल्यवान वस्तू मागितली
कोहिनूर हिरा १०८ कॅरटचा आहे. १८४९ मध्ये महाराजा दलीप सिंह यांनी तो महाराणी व्हिक्टोरियांना दिला होता. १९३७ मध्ये महाराणींनी तो आपल्या मुकूटावर परिधान केला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात कोहिनूर हिऱ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. कोहिनूर हिरा भारतात परत आणला जावा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास काय?
एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे असलेल्या मुकूटाची निर्मिती १९३७ मध्ये झाली. सहाव्या जॉर्ज यांच्या राज्याभिषेकासाठी या मुकूटाची निर्मिती करण्यात आली. या मुकूटामध्ये अनेक मौल्यवान रत्नं आहेत. १८५६ मध्ये तुर्कस्तानच्या तत्कालीन सुलतानानं महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट दिलेलं एक मौल्यवान रत्नही मुकूटामध्ये आहे.

जवळपास ८०० वर्षांपूर्वी भारतात एक चमकता दगड सापडला. त्याला कोहिनूर नाव देण्यात आलं. कोहिनूर हिरा जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे. कूह-ए-नूरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होता. गोलकुंड्यातील खाणीत कोहिनूर हिरा सापडला. पंजाबचे शेवटचे शीख शासक असलेल्या दलिप सिंह यांनी १८४९ मध्ये महाराणींना कोहिनूर हिरा भेट दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here