म. टा. प्रतिनिधी, : पर्वती येथील शाहूनगर वसाहत येथे एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून पिस्तूलातून गोळ्या घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.

अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याने तक्रार दिली. त्यानुसार आदर्श ननावरे (वय २२, रा. धायरी), बोंबल्या उर्फ अभिषेक काळे आणि यशवंत कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कांबळे हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्याकडे आदर्श हा कामाला आहे. अमित याचे आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबध होते. ते आरोपीला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने अमित याला मुलीचा नाद सोडून देण्यास सांगितले होते. तरीही अमित ऐकत नव्हता. तक्रारदार सौरभ आणि अमित रविवारी रात्री पावणेआकराच्या सुमारास शाहू वसाहत येथील ‘बालाजी होलसेल’ येथे थांबले होते. त्या वेळी आरोपी ननावरे हा त्याच्या साथीदारासोबत तेथे आला. त्याने थेट अमितवर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच, बोंबल्या याने अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले. यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले. या घटनेची माहिती नागरिकांकडून मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. आरोपींचा माग काढण्यासाठी दत्तवाडी पोलिसांनी पथके तयार केली होती. त्यानुसार काही तासांतच तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here