Maharashtra Politics | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच काल देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यासाठी मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे आता मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यावर संतापले आहेत. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

हायलाइट्स:
- ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला
- मुरजी पटेल यांचा एक कार्यकर्ता ओक्साबोक्शी रडायला लागला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथून मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अंधेरीत मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला होता. इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे मुरजी पटेल यांचा एक कार्यकर्ता ओक्साबोक्शी रडायला लागला. तर अन्य एका कार्यकर्त्याने ‘सगळे चोर आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. त्यामुळे आता मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा हा संताप कधी शमणार की याचे आणखी तीव्र पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुरजी पटेल अपक्षही लढणार नाहीत, ते पक्षादेशाचे पालन करतील: चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपुरमधून मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. या निवडणुकीत सौ. ऋतुजा लटके या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हा अर्ज मागे घेत आहोत. मुरजी पटेल हे अपक्षही लढणार नाहीत, एकदा भाजपचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही, त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत, त्यांच्यावर शंका घेण्याचं कारण नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुरजी पटेल काय म्हणाले?
पक्षाने जो आदेश दिला आहे तो मी पाळणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर अजिबात कोणाचा दबाव नाही. आणच्यासाठी भाजप आमची आई आहे. मरेपर्यंत पक्षासाठी काम करत राहू, पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्त्वाखाली आयुष्यभर काम करत राहू. पद असो नसो याचा काहीही फरक पडत नाही, अंधेरीच्या जनतेची सेवा आम्ही आयुष्यभर करत राहू. अंधेरीच्या जनतेने मला जी साथ दिली, ती अशीच पुढे देत राहिल. मी आधीही काम करत होतो, पुढेही करत राहिन. लोकांच्या सुख-दु:खा मी पहिले काम करायचो त्यापेक्षा ताकदीने काम करेन.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.