ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात उद्धब बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली. तर रायगड, रत्नागिरी, वाडा, भिंवडी, कल्याणमध्ये शिंदे गटाचा धुव्वा उडाला. ठाकरेंनी बंडखोरांचा वचपा काढत ग्रामपंचायतीच्या मैदानात भगवा फडकवलाय? राज्यातील पाच बंडखोर नेत्यांना ठाकरेंनी त्यांच्याच होमपीचवर घेरलं. उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना त्यांच्याच गावात धडा शिकवत चांगलाच तडाखा दिला. यात कोकणात अधिक वर्चस्व असलेले तीन नेते आहेत. यात आघाडीवर असणारा पहिला बंडखोर नेता म्हणजे मंत्री उदय सामंत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला झटका बसला आहे. निवडणूक झालेल्या ३ ग्रामपंचायतींपैकी शिरगावमध्ये १७ जागा होत्या. यापैकी १४ जागांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. अटीतटीच्या लढती काही ठिकाणी उमेदवारांनी निसटते विजय मिळवले.

ठाकरे गटाचं वर्चस्व

रत्नागिरी जिल्ह्यातलाच उद्धव ठाकरेंकडून फटका बसलेला दुसरा नेता म्हणजे, आमदार योगेश कदम. खेड तालुक्यातील ९ पैकी ८ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने वर्चस्व प्राप्त केलं, असा दावा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे. पण या निवडणुकांपैकी खेड तालुक्यात आस्तान ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. तिथे शिंदे गटाचा सरपंचपदाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला आहे.

ठाकरेंसह महाविकास आघाडीकडून जबरदस्त तडाखा

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना त्याच्यांच होमपीचवर ठाकरेंसह महाविकास आघाडीने जबरदस्त तडाखा दिला. ठाकरेंकडून जबरदस्त धक्का बसलेले ते तिसरे आमदार आहेत. महाड तालुक्यात शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले आहेत. ढालकाठी येथील काळीज-खरवली ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडीचे सरपंच चैतन्य म्हामूणकर निवडून आले. दहा सदस्य निवडून येऊनही गोगावले यांची या पराभवामुळे चांगलीच कोंडी झाली.

शिंदे गटाचा सुपडा साफ

तर दुसरीकडे वाडा, भिवंडी, कल्याणमध्ये शिंदे गटाचा चांगलाच सुफडा साफ झाला. यामुळे शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांना जोरदार झटका बसला. ठाकरेंकडून दणका बसलेले ते चौथे आमदार ठरले. भिवंडीत ३१ पैकी १४ ठिकाणी ठाकरे गटाने वर्चस्व कायम ठेवलं. इथे शिंदे गटाला घोडगाव येथील एकमेव जागेवर समाधान मानावं लागलं. शहापुरात ७९ पैकी ३० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्वावाद सत्ता स्थापन केली. तर एकूण ५१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने सत्ता वर्चस्व मिळवले.

शिवसेनेचा भगवा फडकला

इकडे माणगाव तालुक्यातील पन्हाळगड ग्रामपंचायतीवर देखील शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कोणीही आले तरी आम्हीच जिंकणार असं कर्जतमधील शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे म्हणाले होते. त्यांच्या मोर्चेबांधणी नंतरही मतदारांनी त्यांचा चांगलाच धुव्वा उडवला. खालापूर तालुक्यातील चौक, लोधवलीसह चार ग्रामपंचायतींवर ठाकरेंचा विजय झाला. सरपंच पदी शिवसेनेचे हरदास शेडगे बहुमताने विजयी ठरले. कर्जतमधील पोटल पंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता वर्चस्व मिळवले.

दिवाळीआधीच ठाकरेंकडून जल्लोषाचा बार फुटला

खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे गेले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाकडून शिंदे गटतील नेत्यांचा सुफडा झालाय हे स्पष्ट आहे. त्यातच विजयी उमेदवारांनी फटक्यांची आतीषबाजी करत दिवाळीआधीच ठाकरेंकडून जल्लोषाचा बार फुटला असंही म्हणावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here