Maharashtra Politics | राम यादव यांच्या रुपाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाला आहे. त्यामुळे ठाण्याप्रमाणे मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रुजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल. मात्र, यामुळे भाजपसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येणार का, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- शिंदे गट आणि भाजपमध्ये समेट झाल्याचे दिसत होते
- शिंदे गटाने भाजपसोबतचा हा तह मोडला आहे
- भाजप आणि शिंदे गटाच्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव आणि रेखा यादव (Rekha Yadav) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चौधरी ( BJP MLA Manisha Chaudhary ) यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोपही केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे. राम यादव यांच्या रुपाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाला आहे. त्यामुळे ठाण्याप्रमाणे मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रुजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल. मात्र, यामुळे भाजपसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येणार का, हे पाहावे लागेल.
मुंबईत भाजप-शिंदे गटात वितुष्ट निर्माण होण्याचा धोका
राम यादव आणि रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच्या कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी रेखा यादव यांनी थेट मनिषा चौधरी यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख चौधरी यांच्या दिशेनेच होता. आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे. आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसून दिले जात नसे. आम्हाला त्यांची भेटही मिळत नव्हती, असे रेखा यादव यांनी म्हटले.
रेखा यादव यांनी गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष निवडणूक लढवली होती. तर राम यादव हे भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री होते. शिंदे गटाने राम यादव यांना आगामी महापालिका निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.
भाजपच्या वरिष्ठांनी दिले होते फोडाफोडी थांबवण्याचे आदेश
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे गटातील शिवसेना आमदार राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधीची रसद पुरवून त्यांची ताकद वाढवली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच आम्हाला धोका आहे, असे शिवसेनेतील बंडखोरांचे म्हणणे होते. परंतु, आता भाजपसोबत जाऊनही हाच प्रकार होत असल्यास परिस्थितीत फरक काय पडला, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शिंदे गट आणि भाजपमधील फोडाफोडीच्या राजकारणाचे भविष्यात नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. त्यामुळेच भाजपने आपले नेते आणि कार्यकर्त्यांना तुर्तास सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता शिंदे गटाने हा तह मोडल्याने भाजपचे नेतेही आक्रमक होऊ शकतात.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.