आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तेव्हा आम्हाला सातत्यानं सांगितलं जायचं त्या दोन्ही पक्षांकडे लक्ष ठेवा. ते कधीही पाठीत खंजीर खुपसतील. मात्र प्रत्यक्षात आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास टाकला, हीच आमची चूक झाली. त्यांनी अश्रू ढाळले. पक्षासोबत असं कधीच करणार नाही. तसा विचारही मनात येणार नाही, असं ते आम्हाला सांगत होते. आम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, ही आमची चूक होती, अशी कबुली आदित्य यांनी दिली.
गद्दारी केलेल्या आणखी एका आमदारानं तर पोह्यांवर हात ठेवला होता. मी अन्नाची शप्पथ घेऊन सांगतो, असं त्यांना म्हटलं होतं. मात्र तेदेखील गेले. झालं ते चांगलंच झालं, असं मी मानतो. कारण अशी माणसं पक्षात नको. या ४० जागांवर नव्यांना संधी मिळेल. या ४० जणांमुळे तिथल्या अनेक चांगल्या शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहोचता येत नव्हतं. आता ते ४० जण स्वत:च बाजूला झाले आहेत. त्यामुळे तिथे नवं नेतृत्त्व तयार होईल, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.
तब्बल चाळीस आमदार शिंदेंसोबत गेले. काही जण तर तुम्हाला, उद्धव ठाकरेंना भेटून एकनिष्ठतेच्या आणाभाका घेऊन निघून गेले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही, या प्रश्नालाही आदित्य यांनी उत्तर दिलं. माणूस एकदा विकला गेला की अशा गोष्टींनी काही फरक पडत नसतो. अनेक जण आम्हाला भेटून तिथे गेले. त्यावेळी मी उद्धवजींशी बोललो होतो. त्यावेळी जे विकले गेले आहेत, त्यांना जाऊ देत. त्यांना थांबवून काही अर्थ नाही, अशा स्वरुपाचं उत्तर उद्धव यांनी दिलं होतं, असं आदित्य यांनी सांगितलं.
गद्दारी केलेल्या आमदारांची अवस्था काय होणार आहे ते लवकरच कळेल. कारण त्यांनी खोके घेऊन गद्दारी केली आहे. पुढच्या निवडणुकीत ४० जणांना तिकीट मिळणार नाही. त्यांनी व्हीआरएस घेतल्यात जमा आहे. कारण भाजप त्यांच्या मतदारसंघांवर दावा सांगेल. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, अशी या आमदारांची तक्रार होती. कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून ही टीका होते. वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तरी या टीकेतील फोलपणा लक्षात येईल, असं आदित्य म्हणाले.