Maharashtra Politics | बाळासाहेब दांगट यांची घरवापसी हे या नव्या पॅटर्नचे उदाहरण म्हणता येईल. बाळासाहेब दांगट हे जुन्नर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारून काँग्रेसचा हात धरला होता. तर माजी मंत्री संजय देशमुख आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. राजकीय वर्तुळात ठाकरे गटाकडून राबवण्यात येणाऱ्या या नव्या पॅटर्नची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हायलाइट्स:
- शिवसेनेतील पूर्वीच्या बंडखोर शिलेदारांना साद घालण्याचे प्रयत्न
- बाळासाहेब दांगट हे जुन्नर मतदारसंघाचे माजी आमदार
बाळासाहेब दांगट यांची घरवापसी हे या नव्या पॅटर्नचे उदाहरण म्हणता येईल. बाळासाहेब दांगट हे जुन्नर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारून काँग्रेसचा हात धरला होता. तर माजी मंत्री संजय देशमुख आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. या तिघांपैकी बाळासाहेब दांगट हे दोन टर्म जुन्नर मतदारसंघाचे आमदार होते. दांगट यांच्या घरवापसीने शिंदे गटात गेलेले माजी खासदार आढळराव पाटील आणि माजी आमदार शरद सोनावणे यांच्याविरोधात लढण्यासाठी ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
तर संजय देशमुख यांचा ठाकरे गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. देशमुख हेदेखील माजी शिवसैनिक आहेत. ते यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. संजय देशमुख हे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या निवडणुकीत देशमुख यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष लढूनही ७३ हजार मते मिळवली होती. त्यामुळे संजय देशमुख यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणार आहे. संजय देशमुख यांनीही आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो आहे. मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेले अनेक जुने नेते परतीच्या वाटेवर असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
नेमका प्लॅन काय?
ठाकरे गटाच्या या नव्या रणनीतीबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केले. संजय देशमुख हे ठाकरे गटात परतणार आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या प्रभावशाली बंडखोर नेत्यांना पक्षात पु्न्हा आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. असे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र, या नेत्यांनी आपापल्या विवेकबुद्धीचा वापर करून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. ही शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. संजय राठोड आणि खासदार भावना गवळी, खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला विदर्भात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये नाराज असलेले बुलढाण्यातील नेते विजयराज शिंदे यांना पुन्हा शिवसेनेत (ठाकरे गट) आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. विजयराज शिंदे हे तीन टर्म बुलढाण्याचे आमदार होते. मात्र, त्यांनी अद्याप शिवसेना प्रवेशाबाबत (ठाकरे गट) कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना सोडून गेलेल्या जुन्या नेत्यांना माघारी आणण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवली जात आहे. अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेला (ठाकरे गट) खिंडार नक्कीच पडले आहे. पण यामुळे अनंत गीते आणि सूर्यकांत दळवी यांच्यासारखे पक्षात बाजूला पडलेले नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. ही बाब ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.