उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरे लिहितात, ‘महाराष्ट्रातील कायदा-सुव्यलस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्त्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसतो, ना त्यांना पुरेशा सुट्ट्या मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त; १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते.
हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील… फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील… पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय, असे ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे.
अमित ठाकरेंची आग्रहाची विनंती
गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी अशी आग्रहाची विनंती अमित ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. हा निर्णय घेऊन पोलीस बांधवांची दिवाळी गोड करावी असे आवाहन ठाकरे यांनी शेवटी केले आहे.