कोल्हापूरच्या सिनेसृष्टीची परंपरा व भालजी पेंढारकर यांच्या कार्याची साक्ष असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या बचावासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, चित्रपट व्यावसायिक व रंगकर्मींच्या वतीने गेल्या २८० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. अखेर चित्रपट व्यावसायिकांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलन तीव्र करू व सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. आज आंदोलकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
संभाजीराजे छत्रपतींनीही मांडली भूमिका
या प्रकरणी आता संभाजी राजे छत्रपती यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यांनी ट्विट करत जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे.
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेले अडीचशे दिवस आंदोलन सुरू असून आज आंदोलकांनी उग्र रूप धारण केले आहे. यावेळी काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत सरकारला या विषयात लक्ष घालून जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी केलेली आहे.
छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापूरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी कोल्हापूर येथे स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी हा स्टुडिओ केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरायचा या अटीवर सुप्रसिध्द चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला. बहुतांश नामांकित मराठी चित्रपटांचे शूटिंग हे याच स्टुडिओ मध्ये झालेले आहे. कित्येक हिंदी चित्रपट देखील याठिकाणी घडले. नंतर काही कारणांनी पेंढारकर यांनी देखील या स्टुडिओ वरील ताबा गमविला. कोल्हापूरच्या कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे या स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे.
याविरोधात कोल्हापूरात गेले २५० दिवस कलाक्षेत्राशी निगडीत जनतेचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे.