मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला एसटी महामंडळाचा विसर पडला आहे. राज्याला पूर्ण वेळ परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष नसल्याने एसटीचा कारभार मंदावला आहे. एसटी स्थानक पुनर्विकास, तिकीट मशिन खरेदी, नाथजल असे प्रवासी हिताचे प्रकल्प अधांतरी आहेत. एसटीच्या कारभाराला चालना कधी मिळणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

पुनर्विकास रखडला

सन २०१९मध्ये महाराष्ट्र वाहतूक भवन अर्थात मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय इमारतीच्या पुनर्विकासाची घोषणा झाली होती. यासाठी विकासकांना ३० वर्षांचा कालावधी देण्यात आल्याने ही योजना बारगळली. यात बदल करून विकासकांना ६० वर्षांचा कालावधी देण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून तयार करण्यात आला. मात्र संचालक मंडळाची बैठक न झाल्याने आणि महामंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने हा निर्णय रखडला. अनेक एसटी थांब्यांच्या विकासाचा खोळंबा झाला आहे, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु झालं, राज ठाकरे हळूच कानात कुजबुजले मग शिंदेंनीही ‘राज की बात’ सांगितली!

तिकीट मशिन खरेदी रखडली

राज्यातील एसटी प्रवाशांना डिजिटल तिकीट मिळावे, यासाठी तिकीट मशिन एसटी महामंडळात दाखल करण्यात आली. महामंडळाला रोज ३६ हजार तिकीट मशिनची गरज भासते. यापैकी १८ हजार मशिनबाबत वाहकांच्या तक्रारी आहेत. मशिनमध्ये बिघाड, चार्ज न होणे, बॅटरी खराब असणे, अशा तक्रारी आहेत. मंत्री आणि अध्यक्ष नसल्याने तिकीट मशिन खरेदीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. यावर उपाय म्हणून पूर्वीप्रमाणे तिकीट डब्यातून प्रवाशांना तिकीट देण्यात येते.

शेवटची बैठक पाच महिन्यांपूर्वी

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक मे २०२२मध्ये पार पडली. त्यानंतर राज्यात नवे सरकार आले. मात्र एसटी संचालक मंडळाची बैठक पार पडलेली नाही. गतिमान कारभारासाठी नियमानुसार दर दोन महिन्यांनी बैठक होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहनमंत्रीपदाचा अतिरिक्त भार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही संचालक मंडळाच्या बैठकीबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही.

नाथजलचे काय झाले?

राज्याच्या वारकरी संप्रदायातील प्रथेला घराघरांत पोहोचवण्यासाठी नाथ या नावाने सुरू होणाऱ्या नाथजल बाटली बंद पाण्याची विक्री महामंडळाने सन २०२०मध्ये सुरू केली. ६५० एमएल आणि एक लिटर बाटली बंद पाणी विक्री एसटी स्थानके-आगारांत होणार होती. सध्या अनेक स्थानकांत ६५० एमएलच्या बाटल्या उपलब्ध नाहीत. अनेक स्थानकांत नाथजलला तिलांजली देत स्थानिक ब्रॅण्डची बाटली बंद पाण्याची विक्री जोरदार होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here