मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या आमदारांबाबत निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचं कारण देत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ४० आमदारांसह बंड केलं आणि थेट शिवसेनेवरच दावा सांगितला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदीही विराजमान झाले, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेतून बंड केलेल्या ४० आमदारांना खूश ठेवण्यासाठी झुकतं माप दिलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. याच चर्चेचा धागा पकडत आणि भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यासोबत झालेल्या संवादाचा दाखला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

सामना दैनिकातील रोखठोक या सदरात म्हटलं आहे की, “भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते ‘सह्याद्री’वर भेटले. ते हसत हसत म्हणाले, ‘सरकार शिंदे गटाचे चाळीस आमदार चालवीत आहेत व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांचाच ताबा आहे. आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत.’ ‘मग तुम्ही भाजपचे लोक हे सहन का करता?’ ‘सहन करण्याचा प्रश्नच नाही. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना.’ ‘पुढे काय?’ ‘पुढचं पुढे,’ असा संवाद भाजप नेत्यासोबत झाल्याचा दावा रोखठोकमध्ये करण्यात आला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचं राष्ट्रवादी, शिवसेनेबद्दल मोठं वक्तव्य; ‘त्यांचे पक्ष तेच बुडवतील’

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले, असा हल्लाबोल ‘सामना’त करण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी…’

राज्यातील पोलीस दलातील बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद झाल्याचा दावा करण्यात येत होता. सामनाच्या रोखठोक सदरातही यावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज झाले व सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी देवेंद्र फडणवीस यांना ठोकरून, थोडे रुसून गावी जाऊन बसतील अशी स्थिती नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकून आहे व शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रिपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल,’ असा कयासही रोखठोक सदरातून लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here