Ind Vs Pak | आम्हीही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलो. ती महाराष्ट्रानेच नाही, देशाने आणि जगानेही पाहिली. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

CM Eknath Shinde 900
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झळकला बोर्ड
  • ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख
  • तीन महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकली – एकनाथ शिंदे
ठाणे : टी२० विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारुन (Ind Vs Pak) काल दणक्यात दिवाळी साजरी केली. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही तुफान बॅटिंग केली. साडेतीन महिन्यापूर्वी आम्हीही एक मॅच जिंकली, असं सांगत असतानाच मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झळकलेल्या बोर्डचा उल्लेखही शिंदे यांनी केला. ठाण्यात ते दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

भारत-पाकिस्तान मॅचचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी केली. काल आपण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकली, त्याचाही आनंदोत्सव सगळीकडे साजरा झाला. आपण पाहिलं असेल की नाही, मला माहिती नाही, पण मेलबर्नच्या स्टेडियममध्ये आपली बाळासाहेबांची शिवसेना झळकली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ‘बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली सातासमुद्रापार. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात रंगलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टी – २० विश्वचषक सामन्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. भारतासाठी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे’ असं लिहित एका क्रिकेट चाहत्याने हाती धरलेल्या पोस्टरचा फोटो सुर्वेंनी पोस्ट केला होता.

काय होतं पोस्टरवर?

‘वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे – बाळासाहेबांची शिवसेना दिवा शहर’ असं या पोस्टरवर लिहिलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचे फोटो या पोस्टरवर होते.

एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

आम्हीही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलो. ती महाराष्ट्रानेच नाही, देशाने आणि जगानेही पाहिली. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. सध्या विकासाचं पर्व सुरु आहे, राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आहे, राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिली.

हेही वाचा : कोहलीवर अविश्वास दाखवणारे तोंडावर आपटले, नागपुरात बुकींचं ५०० कोटींचं नुकसान

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here