काल झालेल्या सामन्याच्या आठवणी भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात ताज्या आहेत. अनेकांनी तर सामन्याचे हायलाईट्स वारंवार पाहिले आणि कोहलीची खेळी डोळ्यात साठवून घेतली. कालचा रंगतदार सामना पाहता याच स्पर्धेत पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर येईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. पण असं घडण्याची शक्यता कमी आहे.
भारत आणि पाकिस्तानची लढत झालीच तर ती केवळ अंतिम सामन्यातच होऊ शकते. त्यासाठी दोन्ही संघांची पुढील कामगिरी उत्तम होणं गरजेचं आहे. भारत, पाकिस्तानच्या गटात बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, झिम्बाम्बे, नेदरलँडचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या गटात टॉप २ वर राहिल्यास त्यांना उपांत्य फेरी गाठता येईल. तिथे त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका यांच्यापैकी एकाचा सामना करावा लागू शकतो. भारत आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत बाजी मारल्यास ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर चाहत्यांना भारत वि. पाकिस्तान सामना पाहता येईल.
२००७ ची पुनरावृत्ती होणार?
२००७ मध्ये पहिलीवहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळी भारत, पाकिस्तान एकाच गटात होते. गट साखळीत भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ८ मध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरी गाठली. तर पाकिस्ताननं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले. हा सामना जिंकत भारतानं स्पर्धा जिंकली.