india vs pakistan t20 world cup: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीच्या घणाघाती खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला भारतानं यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घेतला.

आजपासून देशात दिवाळीला सुरुवात झाली. काल रविवार असल्यानं देशभरात दिवाळीची शॉपिंग जोरात होती. मात्र कोहलीचा करिश्मा इतका की शॉपिंगदेखील थांबली. मॅक्स लाईफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर वोरा यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी काल सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान देशभरात झालेल्या यूपीआय व्यवहारांची आकडेवारी दिली आहे.
भारत वि. पाकिस्तान सुरू झाल्यानंतर देशभरातील यूपीआय व्यवहार कमी होण्यास सुरुवात झाली. भारताची फलंदाजी सुरुवात झाल्यानंतरही हाच ट्रेंड पाहायला मिळाला. विराट आणि पांड्याची जोडी जमल्यावर तर यूपीआय व्यवहार आणखी कमी होऊ लागले. ते थेट उणे २० टक्क्यांपर्यंत घसरले. विराटनं भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिल्यानंतर भारतीयांनी जल्लोष केला आणि पुन्हा एकदा शॉपिंगला सुरुवात झाली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.