Maharashtra Politics | शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार कशाला डबल नुकसानभरपाई दिली पाहिजे, पण उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री असताना काय केलं, असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी भू विकास बँकेच्या कर्जमाफीबाबत शरद पवार यांनी केलेल्या टीकेचाही प्रतिवाद केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय का घेतला नाही?

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
- पण उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री असताना काय केले?
उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचाही चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. तुमचं सरकार होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अस्वस्थ केले. शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत मिळणार होती, तीदेखील मिळली नाही. पण आताच्या सरकारने शेतकऱ्यांवर जे जे संकट आलं त्यावेळी मदत केली. शेतकऱ्यांना डबल नुकसानभरपाई दिली. शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत कशाला लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय का घेतला नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
चंद्रकांतदादांचा शरद पवारांवर पलटवार
शिंदे-फडणवीस सरकारने भू विकास बँकेतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भू विकास बँक ही अनेक वर्षांपूर्वी बंद झाली, असे शरद पवार म्हणतात. पण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असणारा भू विकास बँकेच्या शिक्क्याला रिकामे करण्याचे काम आमच्या सरकारने केले. राज्यातील ६३ हजार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असणारा शेरा पुसण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांचा सातबारा कोरा केला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सरकार बरखास्त करण्यासाठी नाना पटोले यांनी कधीही राज्यपालांकडे जावं:चंद्रकांत पाटील
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण दिवाळीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, लोकशाहीत कोणालाही राज्यपालांची भेट घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल राज्यपालांकडे जावं. आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगले आहेत. ते प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतात, सगळ्यांना चहा पाजतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.