काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करा अशी मागणी केली आहे. याबाबत विचारल्यानंतर शिंदे प्रतिक्रिया व्यक्त करत होते. पटोले यांची ही मागणी हास्यास्पद आहे असे ते म्हणाले.
‘राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाली नाही’
दीपोस्तवासाठी आम्ही मनसेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. यावर्षी राज्यात सर्वच सण आनंदाने साजरे होताना दिसत आहेत. त्यावेळी ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झालेली नाही. सण आणि उत्सव इतक्याच विषयांवर त्यांच्याशी बोलणे झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी (Samruddhi Mahamarg Nagpur to Shirdi) या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड (Bhamaragad) येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
‘पुढील महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण’
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्याचे लोकार्पण पुढील महिन्यात होणार असल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. या लोकर्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी
आपले पोलीस जीव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या जीवाला कायम धोका असतो. अशा परिस्थितीतही ते उत्तम काम करीत आहेत. म्हणूनच पोलिसांसोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. त्यांच्यात लढण्याची उर्मी देखील निर्माण होते. मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. मी आता मुख्यमंत्री आहे. आताही मी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला आहे, असे सांगत पोलिसांसोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल’
शेतकऱ्यांरी कोसळलेल्या संकटाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा देखील वाढवली आहे.