मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदारांवर सातत्याने आक्रमक टीका करत आहेत. मुंबईत मंगळवारी ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला.

शिंदे सरकारकडून होणाऱ्या जाहिरातबाजीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘राज्यातील एसटी महामंडळाच्या बसस्थानकावर राज्य सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही, हे अजूनही माहीत नाही. पैसे दिले असतील तर कुणी दिले आणि दिले नसतील तर याची नुकसान भरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. मात्र महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागलं आहे,’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

मुंबई महापालिका निवडणुका कधी? मुख्यमंत्र्यांनी महिना सांगितलाच

‘खरे मुख्यमंत्री कोण?’

राज्यातील सध्याच्या सरकारमधील भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘या सरकारमध्ये मुख्यमंत्री नेमके कोण आहेत? हे सरकार अजूनही राजकारणात अडकलं आहे. सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजूनही जाणवलेलं नाही,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या खरमरीत टीकेला आता सत्ताधारी गोटातून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here