लॉकडाउनमुळे रद्द झालेल्या विमानतिकिटांचा परतावा देण्यास विमानसेवा कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. हजारो प्रवाशांचा असा परतावा एप्रिलपासून रखडला आहे. मुख्य म्हणजे, संयुक्त राष्ट्रांनी सूचना दिल्यानंतरही कंपन्या याबाबत उदासिन आहेत.
एप्रिल ते जून मध्य, हा काळ भारतात पर्यटनाचा असतो. प्रामुख्याने लेह-लडाख, श्रीनगर, दार्जिलिंग येथे पर्यटनाला जाणाऱ्यांची या काळात गर्दी असते. त्यामुळे हजारो प्रवाशांनी या काळातील विमानप्रवासाचे आगाऊ बुकिंग केले होते. तेवढ्यात करोनासंकट आल्याने २५ मार्चपासून लॉकडाउन लागले. यामुळे नेमक्या पर्यटन सत्रातील सर्व विमानसेवा रद्द झाल्या. या रद्द फेऱ्यांच्या तिकिटाचा परतावा देण्यास मात्र कंपन्या तयार नाहीत. जवळपास सर्वच कंपन्या ग्राहकांना ‘क्रेडिट शेल’चे प्रलोभन दाखवत आहेत. याअंतर्गत याच रक्कमेच्या तिकिटावर पुढील वर्षभरात कधीही प्रवास करा’, असे ग्राहकांना भासवले जात आहे. पण त्यावेळी या रक्कमेहून अधिक तिकीटदर असल्याचा तो फरक पुन्हा प्रवाशांनाच भरावा लागणा आहे. याखेरीज पैसा अडकला आहे म्हणून इच्छा नसतानाही बळजबरीने प्रवास का करायचा, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत.
याबाबत रेखा धुरंदर या प्रवासी महिलने संताप व्यक्त केला. रेखा यांच्या सहा जणांच्या समुहाने मुंबई-श्रीनगर व लेह-मुंबई असे एप्रिलचे तिकीट बूक केले होते. जवळपास १.०२ लाख रुपये त्या तिकिटाची किंमत होती. त्यांनी ३ एप्रिललाच तिकिटे रद्द केली. पण गो एअर व स्पाइसजेट या कंपन्यांनी अद्यापही परतावा दिलेला नाही.
याबाबत रेखा यांनी ‘मटा’ ला सांगितले की, ‘कंपन्यांनी एप्रिल २०२१ पर्यंतचा क्रेडिट शेल दिला आहे. वास्तवात आम्हाला पूर्ण परतावा हवा आहे. पण कंपन्या त्यास तयार नाहीत. त्यासह सर्व सहा प्रवासी एकत्र असतील तरच पुढील वर्षीपर्यंत या रक्कमेची तिकिटे काढता येतील, अशी विचित्र अट त्यांनी घातली आहे. सर्व सहा जणांना पुन्हा प्रवासाला जायचे नसल्यास ही बळजबरी का? ही स्थिती हजारो प्रवाशांची आहे. कंपन्यांच्या मनमानीमुळे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times