म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वाघांच्या अधिवासाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज करण्यात येऊ नये. त्याऐवजी प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा हा प्रस्तावित रेल्वे गेज मार्ग इतर पर्यायी भागातून करावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यवरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे. व्याघ्र संवर्धनाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पांचे यश आपण जगभर सांगत असल्याकडेही त्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे.

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वेमार्गाला मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. या रेल्वेमार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वेमार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही. तसेच जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या १०० गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, १९७३-७४ मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. २७६८.५२ चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वेवाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वेगाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील १६ गावे आणि या गाभ्याबाहेरील ६ गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वेमार्गाच्या १० किमी परीघातालीच होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्यजीव झपाट्याने वाढले. भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली आहे.

‘पुनर्विचार करावा’

केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय मंडळासही मेळघाट प्रकल्पाच्या वन अभयारण्यातील १६०.९४ हेक्टर वनजमीन रेल्वेमार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य सरकारला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा, असे कळविले आहे. रेल्वेमार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करतांना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here