पालघर: येथील गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं १२ हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. ‘लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. (No religious angle in Palghar lynchings, say chargesheets)

एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता.

वाचा:

या प्रकरणात पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अलीकडेच अपघाती मृत्यू झाल्यानं पुन्हा संशयकल्लोळ माजला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डहाणू येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयात दोन आरोपपत्रं दाखल केली आहेत. दोन्ही आरोपपत्रात २५० हून अधिक लोकांना आरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ८०८ जणांची चौकशी केली असून ११८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे प्राथमिक आरोपपत्र असून चौकशी सुरूच राहणार आहे. लवकरच पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आतापर्यंत या प्रकरणात १५४ जणांना अटक करण्यात आली असून ११ अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी कोणालाही जामीन मंजूर करण्यात आलेला नाही.

वाचा: २५ जणांचा जामीन फेटाळला!

गडचिंचले हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींपैकी २५ जणांचा जामीन अर्ज डहाणू सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. या २५ आरोपींविरुद्ध ते घटनास्थळी उपस्थित असल्याचे छायाचित्रणाचे पुरावे उपलब्ध असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी विनंती विशेष सरकारी वकील सतीश मानेशिंदे यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here