‘महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून नवी भेट’
महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यांना नेले जात असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ‘केंद्र सरकारने आजच महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलं आहे. पुण्यातील रांझणगाव येथे हा प्रकल्प होईल. तसंच महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून भविष्यात विकसित केलं जाईल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स हे भविष्य असल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही भेटच आहे. नवीन वर्षात केंद्राकडून महाराष्ट्राला टेक्स्टाइल पार्कही दिलं जाईल, अशी मला अपेक्षा आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात भ्रष्टाचार, वसुली, गृहमंत्री तुरुंगात, पोलीस अधिकारी तुरुंगात अशी अनेक भयंकर प्रकरणे घडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही उद्योग यायला तयार नव्हता. महाराष्ट्राची ही जी विस्कटलेली घडी आहे ती जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागच्याच कॅबिनेट बैठकीत आम्ही २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. आज पुन्हा एकदा २५ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आमच्या सरकारने मंजूर केले आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.