Maharashtra Politics | बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांनी मी स्वत: फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, आपल्याला सरकार बनवायचे आहे, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या गटात यावं. माझ्या त्या एका फोन कॉलवरून बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे.

 

Bacchu Kadu Devendra Fadnavis
बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • बच्चू कडू आणि रवी राणांचा वाद मिटला
  • आता फडणवीसांनीही बच्चू कडूंची पाठराखण केली
मुंबई:बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील होण्यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता. यावरुन बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात निर्माण झालेला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे मिटला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भविष्यात बच्चू कडू यांच्यावर असा आरोप कोणीही करूच शकणार नाहीत, याची पूर्णपणे तजवीज केली. देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू हे गुवाहाटीला कसे गेले, याचा संपूर्ण घटनाक्रमक पत्रकार परिषदेत उलगडून सांगितला.

बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांनी मी स्वत: फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, आपल्याला सरकार बनवायचे आहे, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या गटात यावं. माझ्या त्या एका फोन कॉलवरून बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही. पण बच्चू कडू हे माझ्या फोन कॉलवर गुवाहाटीला गेल्यामुळे मला त्यांच्याबाबत पूर्णपणे शाश्वती आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजी करुन शिंदे गटात केल्याचा आरोप करणे चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणामुळे आता भविष्यात रवी राणा किंवा अन्य कोणताही नेता ठरवलं तरी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप करु शकणार नाही. एकूणच रविवारी झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना बच्चू कडू यांची माफी मागायला लावली तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांची भक्कमपणे पाठराखण केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. बच्चू कडू हे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती. अशातच रवी राणा यांनी बेछूट आरोप केल्यामुळे बच्चू कडू प्रचंड संतापले होते. त्यांनी वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारची साथ सोडण्याचा इशारा दिला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांची भक्कमपणे पाठराखण करत त्यांना पूर्णपणे आश्वस्त केल्याचे दिसत आहे.

शिंदे गटाचे आमदारही कोणत्याही प्रलोभनाविना गेले: फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेतल्याच्या आरोपांचेही खंडन केले. माझ्याकडे पक्की माहिती आहे की, जे लोकं गुवाहाटीला गेले होते, ते सर्वजण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेले होते. त्यांना याची कल्पना होती, आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसेल तर आपली आमदारकी जाऊ शकते. तरीही या आमदारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here