ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत वि. बांग्लादेश सामन्यात पावसानं अडथळा आणला आहे. भारतानं बांग्लादेशवृला १८५ धावांचं लक्ष्य दिलं. बांग्लादेशनं पॉवरप्लेमध्ये दे दणादण फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी ७ षटकं टाकल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सध्या बांग्लादेशच्या बिनबाद ६६ धावा झाल्या आहेत. या सामन्यात पाऊस अडथळा आणेल असा अंदाज होता. तो खरा ठरला आहे.

लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं ६ बाद १८४ धावा केल्या. लोकेश राहुलनं ५० तर कोहलीनं नाबाद ६४ धावांची खेळी केली. १८५ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या बांग्लादेशनं आक्रमक सुरुवात केली. ७ षटकांनंतर वरुणराजा बरसू लागला. तोपर्यंत बांग्लादेशनं बिनबाद ६६ अशी मजल मारली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये बाप जन्मात कोणाला जमले नाही; विराटच्या विक्रमाने सर्वांची झोप उडवली
बांग्लादेशचा सलामीवीर लिंटन दासनं भारताविरुद्ध फलंदाजी करताना अक्षरश: दांडपट्टा चालवला. दास २६ चेंडूंवर ५९ धावा काढून नाबाद आहे. यामध्ये त्यानं ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले आहेत. त्याच्या साथीला नजमुल शांतो आहे. दासच्या तुलनेत शांतोची फलंदाजी शांत आहे. तो १६ चेंडूंत ७ धावा काढून नाबाद आहे.

लिंटनच्या आक्रमक फलंदाजीमुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांग्लादेशचा संघ पुढे आहे. बांग्लादेशचा संघ सध्या १७ धावांनी पुढे आहे. पावसाचा अंदाज घेऊन दासनं सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. त्याचा फायदा बांग्लादेशला होताना दिसत आहे.

डकवर्थ लुईस नियम काय सांगतो?
सामन्यात पावसाचा अडथळा आल्यास डकवर्थ लुईस नियम लागू होतो. अशा परिस्थितीत पाठलाग करणाऱ्या संघानं कमी विकेट्स गमावल्या असल्यास त्यांना फायदा मिळतो. ७ षटकांनंतर सामना थांबला आहे. बांग्लादेशनं एकही विकेट गमावलेली नाही. २० षटकांत १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ७ षटकांनंर विकेट गेली नसल्यास डकवर्थ लुईसनुसार आघाडीवर राहण्यासाठी संघाच्या ४९ धावा झालेल्या हव्यात. बांग्लादेशच्या सध्या ६६ धावा झाल्या आहेत. त्यामुळे ते १७ धावांनी पुढे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here