मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत धक्कादायक सामन्यांचा सिलसिला सुरुच आहे. उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असताना दक्षिण आफ्रिकेचा संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आल्यानं आता पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत. लागोपाठ दोन विजय मिळवणाऱ्या पाकिस्ताननं आज बांग्लादेशचा पराभव केल्यास त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल.

दुसऱ्या गटातून भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. या गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत जाईल. पाकिस्तान किंवा बांगलादेश उपांत्य फेरी गाठू शकतो. तर पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. काल इंग्लंडनं विजयाची नोंद केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला. यजमान संघ उपांत्य फेरी न गाठण्याची परंपरा टी-२० विश्वचषक स्पर्धेत कायम राहिली आहे.
भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान कसं असेल मेलबर्नमधील हवामान, इतके टक्के पावसाचा अंदाज
ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर गेल्यानं पाकिस्तानी चाहत्यांना वेगळाच योगायोग दिसू लागला आहे. तीन दशकांपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती होईल आणि पाकिस्तानी संघ विश्वचषक जिंकेल अशी आशा चाहत्यांना आहे. पाकिस्ताननं १९९२ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. विशेष म्हणजे १९८७ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. त्यामुळे १९९२ मध्ये कांगारुंचा संघ स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी झाला होता. विशेष म्हणजे १९९२ ची स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली होती.
T20 World Cup – टीम इंडियाचे स्थान धोक्यात, आजची मॅच जिंकली तर पाकिस्तान भारताच्या पुढे जाणार
यंदाही योगायोग जुळून येणार?
१९८७ ची विश्वचषक स्पर्धा आशियात झाली. ती ऑस्ट्रेलियानं जिंकली. त्यानंतर १९९२ ची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली. मात्र घरच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीदेखील गाठता आली नाही. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियानं आशिया खंडात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. मात्र त्यानंतर यंदा होत ऑस्ट्रेलियन भूमीवर होत असलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत प्रवेश करणंही जमलेलं नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्यावर जेतेपद पाकिस्ताननं पटकावलं होतं. यंदाही ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान उपांत्य फेरीच्या आधीच संपुष्टात आल्यानं पाकिस्तानला जेतेपदाची संधी असल्याचं पाकिस्तानी चाहत्यांना वाटत आहे.

१९९२ ची पुनरावृत्ती होतेय, पण एक अपवाद
१९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ लवकर बाद झाला. त्यावेळी न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरी गाठली होती. पण यंदा चित्र वेगळं आहे. पहिल्या गटातून न्यूझीलंड, इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठली आहे. पण दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचला आलेलं नाही. आफ्रिकेच्या जागी भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here