खरेतर, अंधेरीची निवडणूक शिंदे गटाला लढवायचीच नव्हती तर चिन्हाचा वाद इतक्या तातडीने पराकोटीला जाण्याचे तसे काही कारण नव्हते. मात्र, तसा तो गेला. त्याचप्रमाणे, लटके यांनी महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यातही विलंब झाला. इतके होऊनही भाजपने उमेदवारच ऐनवेळी मागे घ्यावा, हे गौडबंगालच होते. खरेतर, मुंबईतील मूळ शिवसेनेचा नेमका किती मतदार शिंदे गटाकडे सरकला आहे, याचा थोडासा अंदाज भाजप-शिंदे गटाने निवडणूक लढविली असती तर आला असता. भाजपने ही ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवण्यात पक्षातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण होते की ठाकरे गटाच्या संभाव्य विजयाची झळाळी निस्तेज करण्याची खेळी होती, याची चर्चा होत राहील. मात्र, हा सामना शिवसेना आणि भाजप असा झालाच असता आणि हाच निकाल लागला असता तर शिवसेनेची ताकद कितीतरी वाढली असती.
यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे गट आणि भाजप या दोघांसाठीही कमालीची महत्त्वाची आहे. ठाकरे गटासाठी तर ती निर्णायकच आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मराठी ते हिंदुत्व आणि त्यानंतर मुस्लिमांसहित सगळ्यांनाच सोबत घेऊन जाण्यापर्यंत समावेशक होत गेले आहेत. त्यांची ही नवी सर्वसमावेशकता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कशी फळते, हे पाहावे लागेल. मात्र, काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी जी विधाने केली; त्यावरून मुंबई तसेच इतर महापालिकांच्या निवडणुका किती चुरशीच्या होतील, याची कल्पना येते. अंधेरी जिंकली म्हणजे पुढचा सारा प्रवास सोपा झाला, असे नाही. येत्या तीन महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक झालीच तर खरी लढाई होईल. त्या लढाईची चांगली तयारी शिवसेनेने अंधेरीत केली आहे. महाराष्ट्रात भाजपने पोटनिवडणुकीतून अशी माघार घेतली असली तरी देशातील इतर सहापैकी चार पोटनिवडणुका जिंकून भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. बिहारमधील गोपाळगंज येथील निवडणूक भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची होती. नितीशकुमार यांनी साथ सोडूनही भाजपने ही जागा राखली. मात्र, मोकामा ही जागा लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाने राखली आहे. उडिशात भाजप आमदाराच्या निधनाने पोटनिवडणूक झाली असली तरी धामनगर मतदारसंघात भाजपने चांगला विजय मिळवला आहे. तेलंगणातही टीआरएस जिंकला असला तरी तेथेही लढत जोरदार झाली. भाजपच्या विरोधात सारे विरोधक एकत्र येतात का, याच प्रश्नाची चर्चा या निकालांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे पक्षप्रमुख सहभागी झाले; तरच अंधेरी निवडणुकीच्या निकालाचे पाऊल पुढे पडले, असे मानता येईल.