औरंगाबाद: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. मात्र, आज सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. दुसरीकडे कुठेतरी कॉर्नर सभा सुरु आहे, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. आमच्या सभेला परवानगी देत नसल्याचे सांगत काही लोकांनी प्रचंड गाजावाजा केला. त्यावर मी अब्दुल सत्तार यांना म्हणालो की, त्यांनी हव्या त्या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी द्या, एवढेच नव्हे तर त्यांना लागेल ते द्या. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, आपण त्यांना सगळं काही पुरवू पण लोकं कुठून आणणार? जाहीर सभा घेण्यासाठी आपल्यावर प्रेम करणारी माणसं लागतात. ती आदित्य ठाकरे कुठून आणणार होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी विचारला. ते सोमवारी सिल्लोड येथील जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. आपण शिवसेनेत असताना आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी कशाप्रकारे माणसे जमवायचो, याचा किस्सा श्रीकांत यांनी सांगितला. आम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत सभेला जायचो. कुठून कुठून लोकं आणायचो आम्हाला माहिती आहे. काही लोकांना गच्चीवर, काही लोकांना बाजूला, काही लोक गर्दीत पाठवायचो. आदित्य ठाकरे यांनी भाषणात एखादा डायलॉग मारला की या लोकांना टाळ्या वाजवायला लावायचो. हे सगळं आम्ही त्यांच्यासाठी केले आहे. पण आज आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासाठी काम करणारी लोकं उरली नाहीत, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

तसेच श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या दौऱ्याचीही खिल्ली उडविली. सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.
सिल्लोडमधील सभेवरुन परवानगीनाट्य, आदित्य ठाकरेंनी तीन शब्दात विषय संपवला

अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात: श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच शिवसेना भवनात झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणूक लागू शकते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले होते. काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले होते.

महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचा दावाही श्रीकांत शिंदे यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here