Mumbai local news | काहीवेळापूर्वीच पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या जलद मार्गावरील लोकल ट्रेन्सचा (Local Train) खोळंबा झाला आहे. बराच वेळेपासून जलद मार्गावरील ट्रेन्स जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळेत पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

हायलाइट्स:
- मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत
- पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतुकीचा खोळंबा
चार दिवसांपूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अशाचप्रकारे विस्कळीत झाली होती. तेव्हादेखील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे प्रवाशांना सातत्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मध्य रेल्वेचाही खोळंबा
तांत्रिक बिघाड पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी वाहतूकीचा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन्स उशीराने धावत आहेत. अनेक गाड्या १५ ते ३० मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. विशेषत: अप मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीरा धावल्याने हा सगळा घोळ निर्माण झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. लोकल ट्रेन्स उशीरा धावत असल्याने प्रवाशांना बराच काळ स्थानकांवर तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बराच वेळ उलटूनही लोकल वाहतूक विलंबाने सुरु असल्याने रेल्वे स्थानकांवर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.