Authored by विशाल बडे | Maharashtra Times | Updated: 9 Nov 2022, 1:06 pm
Abdul Sattar: अब्दुल सत्तार.. रामराम, सलाम, जयभीम, जय हिंद, जय महाराष्ट्र असं एका दमात म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना २०१० मध्ये एक प्रकरण असं भोवलं, की त्यात राजीनामा द्यावा लागला. कायम सत्तेत राहून आपल्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यात सत्तार पटाईत आहेत, त्यातूनच ते पदं मिळवतात, बेताल वक्तव्य करतात आणि वातावरण तापलं की हसून त्या वक्तव्याचं गांभीर्य घालवतात. सुप्रिया सुळेंवर वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आलेल्या अब्दुल सत्तारांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली, पण एकाही घटनेतून त्यांनी धडा घेतला नाही. सिल्लोड मतदारसंघावर एकहाती वर्चस्व ठेवणारे अब्दुल सत्तार आतापर्यंत बेताल वक्तव्य करत आले आणि वादातही सापडले.

हनुमानाचं नाव घेत केलेली शिवीगाळ

अब्दुल सत्तार यापूर्वीही असेच वादात सापडले होते. आघाडी सरकारमध्ये आमदार असताना अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील एका व्यक्तीला हिंदूचं दैवत असलेल्या हनुमानाचं नाव घेत शिवीगाळ केली. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या नंतर शिवसेनेच्या वतीने त्यांना हिरवा साप असं संबोधलं गेलं. बोराडे नावाच्या महिलेने अब्दुल सत्तार यांनी जमीन हडपली अशी तक्रार केली. महिलेने रक्ताने ईडीला पत्र लिहिलं. मंत्रालयात विवस्त्र आंदोलन करण्याचा प्रयत्नही केला होता.
दारू पिता का?, जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न

टी. ई. टी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव आल्यानंतर बरीच टीका झाली. यावेळी शिवसेनेच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? अशी विचारणा केली. त्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र देवेंद्र फडणीवस यांच्या सल्ल्यानंतर शिवसेनेत आलो, असं वक्तव्य शिवसेना प्रवेशानंतर केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला शिवीगाळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला शिवीगाळ केल्या प्रकरणीही ते अडचणीत आले होते. निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीत तफावत प्रकरणी न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. टुरिस्ट सेंटरसाठी आरक्षित जागेवर कॉम्प्लेक्स बांधल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांचं नाव आलं होतं. नोटाबंदी काळात रावसाहेब दानवे यांनी नोटा बदलल्या आणि मलाही बदलून दिल्या, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.
शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसमधील नेत्यांमध्ये आपणच केंद्रस्थानी असावं यासाठी सत्तार यांनी प्रयत्न करुन पाहिले. काँग्रेसचं सत्तेत येण्याचं गणित बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर पक्ष बदलण्याचं चातुर्य सत्तार यांच्याकडे होतं. या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कमालीची स्तुती केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेल्या प्रचार यात्रेच्या बसमध्येही ते चढले. पण त्यांनी शिवसेनेत जावं असा सल्ला तेव्हा भाजपकडून देण्यात आला. पुढे त्यांनी ‘शिवबंधन’ बांधलं.
ठाकरेंची साथ सोडली

शिवसेनेत त्यांना मंत्रीपद मिळालं. पण बंडखोरीनंतर सत्तारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने कूच केली आणि ठाकरेंची साथ सोडली. अब्दुल सत्तार कायम सत्तेत असतात. त्यामुळे आपलं कुणीच काहीही करू शकत नाही या आत्मविश्वासामुळे ते कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही असंच वक्तव्य केलं आणि ते चर्चेत आले. आता या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तारांचा राजीनामा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.